यश चोप्रा म्हणजे माझे एक आवडते बॉलिवुडचे दिग्दर्शक. असंख्य भारतीयांना स्वप्नांच्या सुंदर, सुरेल दुनियेत नेऊन बोचरा, त्रास देणारा वर्तमानकाळ विसरायला लावणारे जादुगार. स्वत: यशजींनी उत्तमोत्तम चित्रपट बनवलेच, पण पुढे यशराज फिल्म्सतर्फे अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मितीदेखील केली.
King of Romance म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशजींनी प्रेमपटांना अतिशय सुंदर पध्दतीने प्रेझेन्ट केलं.
यशजींचा मुलगा आदित्य चोप्रा. त्याचा पहिलाच चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. अठरा वर्षांपूर्वी आलेला आणि लोकप्रियतेचे उच्चांक सर केलेला हा चित्रपट आजही रोमॅंटिक चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवून आहे. आदित्यने पहिल्याच चित्रपटात आपल्या पित्याचा वारसा समर्थपणे पेलला.
पुढे काही वर्षांनंतर मात्र आदित्यने ’रब ने बना दी जोडी’ बनवला आणि तो चित्रपट मात्र माझ्या डोक्यात गेला. DDLJ बनवणारा दिग्दर्शक ’रब ने’ सारखा बिनडोक चित्रपट बनवू शकतो? ’रब ने’ ने धंदा मात्र चांगला केला. काळाची पावलं ओळखून यशराजनेही रोमान्सवर भर न देता धूमसारखे सिनेमे बनवायला सुरुवात केली.
यश चोप्रांचा मरणोत्तर प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. ’जब तक है जान’. तो प्रदर्शित झाला त्यावेळी चित्रपटगृहात जाऊन बघता आला नाही. अलीकडेच छोटया पडदयावर पाहिला. रोमॅन्टिक आणि नर्म विनोदी असा हा चित्रपट आहे.
समर आनंद (शाहरुख खान) लंडनमध्ये राहणारा अठ्ठावीस वर्षांचा तरुण आहे. (शाहरुख खानचं वय अठ्ठावीस दाखवणं हा विनोद की दुर्दैव हे तुम्हीच ठरवायचं.) तो मीरा(कट्रिना कैफ) नामक सौंदर्यवतीच्या प्रेमात पडतो. तीही त्याच्या प्रेमात पडते. समरला अपघात होतो. मीरा समरचा जीव वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि तो वाचल्यास त्याच्यापासून दूर जायचं ठरवते. आपण त्याच्यापासून दूर जायचं ठरवलं तरच त्याचा जीव वाचेल असं मीराला का वाटतं, याचं समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.
असो. तर मीरासारखी सौंदर्यवती हातची गेल्यामुळे समरला अर्थातच दु:ख होतं. आता अशावेळी एखादा नॉर्मल मुलगा काय करेल? मीरा कितीही सुंदर असली तरी डोक्याने अंमळ अधू आहे हे लक्षात घेऊन ब्रेक-अप झाला ते बरंच झालं असा विचार करेल, वधूवरसूचक मंडळात नाव नोंदवेल आणि आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करुन संसाराला लागेल. पण समरला फारच दु:ख झालंय आणि त्याचा हार्टब्रेक झालाय अगदी.
म्हणून तो भारतात परत येतो आणि इंडियन आर्मीत भरती होतो. (आर्मीत त्याला अशी सहजासहजी नोकरी कशी मिळते वगैरे प्रश्न विचारायचे नाहीत. हिरो आहे ना तो. मग? त्याला शक्य आहे सगळं. आजकाल कुठेही इतक्या सहज नोकरी मिळत नाही हा भाग वेगळा. पण असो.) आर्मीत भरती होण्यामागे देशप्रेम किंवा साहसाची, सैनिकी जीवनाची आवड वगैरे काही नसते. आर्मीत जाऊन रोज मृत्यूला आव्हान दयायचं- म्हणजे मग मीराने घेतलेली शपथ आणि आपलं तिच्यावरचं प्रेम- यातल्या एकाची निवड देव करेल- हा समरचा उद्देश असतो. त्याप्रमाणे तो बॉम्ब निकामी करणाऱ्या टीममध्ये काम करु लागतो. दहा वर्षं जातात.
अकिरा (अनुष्का शर्मा) नावाची एकवीस वर्षांची सुंदर पत्रकार आता समरला भेटते, त्याची डायरी वाचते आणि त्याच्यावर ’स्टोरी’ करायचं ठरवते. त्याचवेळी त्याच्या प्रेमातही पडते. अकिराच्या स्टोरीसाठी ती समरला लंडनला बोलावते- फक्त एक दिवसासाठी- आणि तो लगेच जातो. (पुण्यातले लोक कोथरुडहून कर्वे नगरला जातात इतक्या सहजतेने यशराज फिल्म्सच्या चित्रपटातले लोक भारतातून लंडनला जातात.) आता लंडनमध्ये त्याला अपघात होतो. अकिरा त्याला हॉस्पिटलमधे ॲडमिट करते. तो शुध्दीवर आल्यावर डॉक्टरांच्या लक्षात येते- त्याची ’याददाश्त’ खो गेलेय (म्हणजे हरवलेय हो!) आणि त्याला असं वाटतंय की तो २००२ मध्ये आहे. (कोथरुडहून कर्वेनगरला जावं इतक्या सहजतेने तो २०१२ मधून २००२ मध्ये जातो.)
आता हा याददाश्तवाला फॉर्म्युला मराठी-हिंदी सीरीयलवाल्यांनी इतका वापरलाय की त्याची मजाच गेलेय. एकता कपूरच्या एका सीरीयलमध्ये तर आधी नायिकेच्या दुसऱ्या नवऱ्याची याददाश्त जाते, मग तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाची याददाश्त जाते आणि मग खुद्द नायिकेची याददाश्त जाते. या सगळ्या ट्रॅक्समध्ये दीडेक वर्षं निघून गेलं होतं. आणि मग शिवाय शेवटी कळतं की नायिकेची याददाश्त गेलीच नव्हती- तिचा पहिला नवरा तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा खून करेल या संशयामुळे त्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने याददाश्त गेल्याचं नाटक केलं होतं-पण मग तिला शेवटी कळतं की पहिला नवरा बिचारा अगदीच निरपराध आहे! तर त्यामुळे हे ’याददाश्त’ प्रकरण म्हणजे मध्येच एकदम टीव्ही सीरीयल सुरु झाल्यासारखं वाटलं.
आता तमाम याददाश्त गेलेल्या लोकांप्रमाणेच समरची स्थिती नाजूक असते आणि कुठलाही धक्का त्याला सहन होणार नसतो. मग अकिरा मीराला शोधून काढते आणि समरला भेटवते. समरला सांगण्यात येतं की त्याचं आणि मीराचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालंय आणि तो लंडनमध्ये स्थायिक झालाय. यासाठी समरच्या एका पाकिस्तानी मित्राची मदत घेण्यात येते जो अर्थातच स्वभावाने खूप चांगला असतो. (बॉलिवुडपटांत पाकिस्तानी लोक नेहमी इतके चांगले का दाखवतात?) मीरा-समर असे पुन्हा एकत्र येतात. मग पुन्हा समरची मेमरी परत येते. मीराला आपली चूक उमगते. अकिराला तिची ’स्टोरी’ मिळते. आनंदीआनंद होतो.
डोकं बाजूला काढून न ठेवता बघितला तर त्रास होईल असा हा चित्रपट आहे. पण तरी यात काही खास ’यश चोप्रा’ स्पेशल टच आहेच. अकिराने समरवर प्रेम असल्याचं त्याला सांगितल्यावर तो तिच्या सादाला प्रतिसाद देत नाही. आपलं मीरावरच प्रेम आहे याबद्दल तो ठाम आहे. अकिराही सर्व शांतपणे समजून घेते आहे आणि समर-मीरा एकत्र यावेत असं तिलाही वाटतंय. यामुळे एक घिसा-पिटा प्रेमत्रिकोण निर्माण होत नाही. तो तसा न होणं हे खूपच सुखद आहे. यातच दिग्दर्शकाचं ’यश’ही आहे.
समर आणि मीराने वेगळं झाल्यावरही दहा वर्षं एकमेकांवर प्रेम करत राहणं, एकमेकांशी निष्ठावान राहाणं, आणि दहा वर्षांनी एकत्र आल्यावर त्यांच्या प्रेमातली उत्कटता तशीच असणं- ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडली. दर महिन्याला जोडीदार बदलण्याचा ट्रेन्ड असणाऱ्या आजच्या जगात असं प्रेम कुठे बघायला मिळतं- प्रत्यक्षात तर जाऊच दया, पण पडदयावरही असं बेफाट प्रेम क्वचितच दिसतं. रोमान्सचा तुटवडा असणाऱ्या आजच्या जगात हा रोमान्स मनाला भावतो.
चित्रपटातली गाणी रहमानचं संगीत असूनही फारशी खास नाहीयेत. ’जब तक है जान’ हे टायटल गीत आणि ’सांस’ हे मुख्य गाणं सोडलं तर बाकी गाणी ठीकठाकच आहेत. त्यातही ’सांस’ हे गाणं कानाला गोड वाटत असलं तरी मला उगाचच वाटत राहिलं की विधुर सासऱ्याने दुसरं लग्न करुन नवीन सासू घरी आणल्यावर सुनेने आनंद व्यक्त करायला गायलेलं हे गाणं असावं- मुझे सांस आयी, मुझे सांस आयी.
कलाकारांविषयी लिहायचं तर कट्रिना कैफ सुंदर दिसली आहे आणि कामही तिने चांगलं केलंय. तिच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडला असेल. अनुष्का शर्मा चाचरत, तोतरेपणानी आणि भराभर बोलत असल्यामुळे तिचे काही संवाद नीट कळत नाहीत. कट्रिनाच्या मानाने तिचा प्रभाव पडत नाही. शाहरुख काकांविषयी काय लिहावं? कट्रिना-अनुष्काचा हिरो कमी आणि वडिलधारे काकाच जास्त वाटणाऱ्या शाहरुख खानने नेहमीच्या सफाईने काहीकाही सीन्समध्ये आपला ’signature' अभिनय केला आहे. पण बाकी एकंदरीत काहीकाही गोष्टी पंचवीशीच्या तरुणाने केल्या तर शोभून दिसतात, तेच पन्नाशीच्या काकांनी केल्यावर ’म्हातारा चळलाय’ असं वाटतं.
बाकी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम देखणी, आकर्षक, नयनरम्य आहे, यश चोप्रांच्या नावाला साजेशी आहे. शेवटच्या चित्रपटात काही त्रुटी जरी असल्या तरी एक प्रेमात पाडणारी प्रेमकथा यशजींनी नक्कीच दिली आहे. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या चित्रपटांतून त्यांचं नाव सिनेप्रेमींच्या मनात कायम राहील, यात शंका नाही.