Sunday, April 28, 2013

जब तक है जान.....


यश चोप्रा म्हणजे माझे एक आवडते बॉलिवुडचे दिग्दर्शक. असंख्य भारतीयांना स्वप्नांच्या सुंदर, सुरेल दुनियेत नेऊन बोचरा, त्रास देणारा वर्तमानकाळ विसरायला लावणारे जादुगार. स्वत: यशजींनी उत्तमोत्तम चित्रपट बनवलेच, पण पुढे यशराज फिल्म्सतर्फे अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मितीदेखील केली.
King of Romance म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशजींनी प्रेमपटांना अतिशय सुंदर पध्दतीने प्रेझेन्ट केलं.
यशजींचा मुलगा आदित्य चोप्रा. त्याचा पहिलाच चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. अठरा वर्षांपूर्वी आलेला आणि लोकप्रियतेचे उच्चांक सर केलेला हा चित्रपट आजही रोमॅंटिक चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवून आहे. आदित्यने पहिल्याच चित्रपटात आपल्या पित्याचा वारसा समर्थपणे पेलला.
पुढे काही वर्षांनंतर मात्र आदित्यने ’रब ने बना दी जोडी’ बनवला आणि तो चित्रपट मात्र माझ्या डोक्यात गेला. DDLJ बनवणारा दिग्दर्शक ’रब ने’ सारखा बिनडोक चित्रपट बनवू शकतो? ’रब ने’ ने धंदा मात्र चांगला केला. काळाची पावलं ओळखून यशराजनेही रोमान्सवर भर न देता धूमसारखे सिनेमे बनवायला सुरुवात केली.

यश चोप्रांचा मरणोत्तर प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. ’जब तक है जान’. तो प्रदर्शित झाला त्यावेळी चित्रपटगृहात जाऊन बघता आला नाही. अलीकडेच छोटया पडदयावर पाहिला. रोमॅन्टिक आणि नर्म विनोदी असा हा चित्रपट आहे.

समर आनंद (शाहरुख खान) लंडनमध्ये राहणारा अठ्ठावीस वर्षांचा तरुण आहे. (शाहरुख खानचं वय अठ्ठावीस दाखवणं हा विनोद की दुर्दैव हे तुम्हीच ठरवायचं.) तो मीरा(कट्रिना कैफ) नामक सौंदर्यवतीच्या प्रेमात पडतो. तीही त्याच्या प्रेमात पडते. समरला अपघात होतो. मीरा समरचा जीव वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि तो वाचल्यास त्याच्यापासून दूर जायचं ठरवते. आपण त्याच्यापासून दूर जायचं ठरवलं तरच त्याचा जीव वाचेल असं मीराला का वाटतं, याचं समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.
असो. तर मीरासारखी सौंदर्यवती हातची गेल्यामुळे समरला अर्थातच दु:ख होतं. आता अशावेळी एखादा नॉर्मल मुलगा काय करेल? मीरा कितीही सुंदर असली तरी डोक्याने अंमळ अधू आहे हे लक्षात घेऊन ब्रेक-अप झाला ते बरंच झालं असा विचार करेल, वधूवरसूचक मंडळात नाव नोंदवेल आणि आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करुन संसाराला लागेल. पण समरला फारच दु:ख झालंय आणि त्याचा हार्टब्रेक झालाय अगदी.

म्हणून तो भारतात परत येतो आणि इंडियन आर्मीत भरती होतो. (आर्मीत त्याला अशी सहजासहजी नोकरी कशी मिळते वगैरे प्रश्न विचारायचे नाहीत. हिरो आहे ना तो. मग? त्याला शक्य आहे सगळं. आजकाल कुठेही इतक्या सहज नोकरी मिळत नाही हा भाग वेगळा. पण असो.) आर्मीत भरती होण्यामागे देशप्रेम किंवा साहसाची, सैनिकी जीवनाची आवड वगैरे काही नसते. आर्मीत जाऊन रोज मृत्यूला आव्हान दयायचं- म्हणजे मग मीराने घेतलेली शपथ आणि आपलं तिच्यावरचं प्रेम- यातल्या एकाची निवड देव करेल- हा समरचा उद्देश असतो. त्याप्रमाणे तो बॉम्ब निकामी करणाऱ्या टीममध्ये काम करु लागतो. दहा वर्षं जातात.
अकिरा (अनुष्का शर्मा) नावाची एकवीस वर्षांची सुंदर पत्रकार आता समरला भेटते, त्याची डायरी वाचते आणि त्याच्यावर ’स्टोरी’ करायचं ठरवते. त्याचवेळी त्याच्या प्रेमातही पडते. अकिराच्या स्टोरीसाठी ती समरला लंडनला बोलावते- फक्त एक दिवसासाठी- आणि तो लगेच जातो. (पुण्यातले लोक कोथरुडहून कर्वे नगरला जातात इतक्या सहजतेने यशराज फिल्म्सच्या चित्रपटातले लोक भारतातून लंडनला जातात.) आता लंडनमध्ये त्याला अपघात होतो. अकिरा त्याला हॉस्पिटलमधे ॲडमिट करते. तो शुध्दीवर आल्यावर डॉक्टरांच्या लक्षात येते- त्याची ’याददाश्त’ खो गेलेय (म्हणजे हरवलेय हो!) आणि त्याला असं वाटतंय की तो २००२ मध्ये आहे. (कोथरुडहून कर्वेनगरला जावं इतक्या सहजतेने तो २०१२ मधून २००२ मध्ये जातो.)


आता हा याददाश्तवाला फॉर्म्युला मराठी-हिंदी सीरीयलवाल्यांनी इतका वापरलाय की त्याची मजाच गेलेय. एकता कपूरच्या एका सीरीयलमध्ये तर आधी नायिकेच्या दुसऱ्या नवऱ्याची याददाश्त जाते, मग तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाची याददाश्त जाते आणि मग खुद्द नायिकेची याददाश्त जाते. या सगळ्या ट्रॅक्समध्ये दीडेक वर्षं निघून गेलं होतं. आणि मग शिवाय शेवटी कळतं की नायिकेची याददाश्त गेलीच नव्हती- तिचा पहिला नवरा तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा खून करेल या संशयामुळे त्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने याददाश्त गेल्याचं नाटक केलं होतं-पण मग तिला शेवटी कळतं की पहिला नवरा बिचारा अगदीच निरपराध आहे! तर त्यामुळे हे ’याददाश्त’ प्रकरण म्हणजे मध्येच एकदम टीव्ही सीरीयल सुरु झाल्यासारखं वाटलं.

आता तमाम याददाश्त गेलेल्या लोकांप्रमाणेच समरची स्थिती नाजूक असते आणि कुठलाही धक्का त्याला सहन होणार नसतो. मग अकिरा मीराला शोधून काढते आणि समरला भेटवते. समरला सांगण्यात येतं की त्याचं आणि मीराचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालंय आणि तो लंडनमध्ये स्थायिक झालाय. यासाठी समरच्या एका पाकिस्तानी मित्राची मदत घेण्यात येते जो अर्थातच स्वभावाने खूप चांगला असतो. (बॉलिवुडपटांत पाकिस्तानी लोक नेहमी इतके चांगले का दाखवतात?) मीरा-समर असे पुन्हा एकत्र येतात. मग पुन्हा समरची मेमरी परत येते. मीराला आपली चूक उमगते. अकिराला तिची ’स्टोरी’ मिळते. आनंदीआनंद होतो.
डोकं बाजूला काढून न ठेवता बघितला तर त्रास होईल असा हा चित्रपट आहे. पण तरी यात काही खास ’यश चोप्रा’ स्पेशल टच आहेच. अकिराने समरवर प्रेम असल्याचं त्याला सांगितल्यावर तो तिच्या सादाला प्रतिसाद देत नाही. आपलं मीरावरच प्रेम आहे याबद्दल तो ठाम आहे. अकिराही सर्व शांतपणे समजून घेते आहे आणि समर-मीरा एकत्र यावेत असं तिलाही वाटतंय. यामुळे एक घिसा-पिटा प्रेमत्रिकोण निर्माण होत नाही. तो तसा न होणं हे खूपच सुखद आहे. यातच दिग्दर्शकाचं ’यश’ही आहे.
समर आणि मीराने वेगळं झाल्यावरही दहा वर्षं एकमेकांवर प्रेम करत राहणं, एकमेकांशी निष्ठावान राहाणं, आणि दहा वर्षांनी एकत्र आल्यावर त्यांच्या प्रेमातली उत्कटता तशीच असणं- ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडली. दर महिन्याला जोडीदार बदलण्याचा ट्रेन्ड असणाऱ्या आजच्या जगात असं प्रेम कुठे बघायला मिळतं- प्रत्यक्षात तर जाऊच दया, पण पडदयावरही असं बेफाट प्रेम क्वचितच दिसतं. रोमान्सचा तुटवडा असणाऱ्या आजच्या जगात हा रोमान्स मनाला भावतो.


चित्रपटातली गाणी रहमानचं संगीत असूनही फारशी खास नाहीयेत. ’जब तक है जान’ हे टायटल गीत आणि ’सांस’ हे मुख्य गाणं सोडलं तर बाकी गाणी ठीकठाकच आहेत. त्यातही ’सांस’ हे गाणं कानाला गोड वाटत असलं तरी मला उगाचच वाटत राहिलं की विधुर सासऱ्याने दुसरं लग्न करुन नवीन सासू घरी आणल्यावर सुनेने आनंद व्यक्त करायला गायलेलं हे गाणं असावं- मुझे सांस आयी, मुझे सांस आयी.


कलाकारांविषयी लिहायचं तर कट्रिना कैफ सुंदर दिसली आहे आणि कामही तिने चांगलं केलंय. तिच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडला असेल. अनुष्का शर्मा चाचरत, तोतरेपणानी आणि भराभर बोलत असल्यामुळे तिचे काही संवाद नीट कळत नाहीत. कट्रिनाच्या मानाने तिचा प्रभाव पडत नाही. शाहरुख काकांविषयी काय लिहावं? कट्रिना-अनुष्काचा हिरो कमी आणि वडिलधारे काकाच जास्त वाटणाऱ्या शाहरुख खानने नेहमीच्या सफाईने काहीकाही सीन्समध्ये आपला ’signature' अभिनय केला आहे. पण बाकी एकंदरीत काहीकाही गोष्टी पंचवीशीच्या तरुणाने केल्या तर शोभून दिसतात, तेच पन्नाशीच्या काकांनी केल्यावर ’म्हातारा चळलाय’ असं वाटतं.

बाकी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम देखणी, आकर्षक, नयनरम्य आहे, यश चोप्रांच्या नावाला साजेशी आहे. शेवटच्या चित्रपटात काही त्रुटी जरी असल्या तरी एक प्रेमात पाडणारी प्रेमकथा यशजींनी नक्कीच दिली आहे. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या चित्रपटांतून त्यांचं नाव सिनेप्रेमींच्या मनात कायम राहील, यात शंका नाही.

Sunday, April 21, 2013

फुटक्या खिडक्यांची घरं


वसंत श्रीधर फडकेंनी घराचं दार किल्लीने उघडलं, किल्ली परत जाग्यावर ठेवली आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवणाची पिशवी टेबलावर ठेवली. बटाटयाचा रस्सा, गवारची भाजी, चार पोळ्या, भात, फोडणीचे वरण - त्यांनी जिन्नस वेगवेगळ्या भांडयांत काढले. सोबत सायलीच्या आईने दिलेले घरी केलेले आंब्याचे लोणचे आणि वसंत फडकेंनी स्वत: घरी विरजण लावून केलेले दही. त्यांनी पोळी-भाजी केंद्रातून आणलेले जेवण दुपार आणि रात्र दोन्ही वेळी पुरेल इतके होते.

आपले ताट वाढून घेऊन फडके हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले व त्यांनी रिमोट कंट्रोलने टीव्ही लावला. सगळ्या न्यूज चॅनेल्सवर त्याच त्याच बातम्या- राजकारणी भ्रष्टाचार करतायत,घरांचे भाव वाढतायत, बायकांवर आणि लहान मुलामुलींवर बलात्कार होतायत, सुप्रीम कोर्टाने सजा सुनावलेल्या बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट शंभर करोडचा गल्ला जमवतायत, दुष्काळात राज्य होरपळतंय. वसंतरावांनी ताडकन टीव्ही बंद केला. त्यांना जेवण जाईना. तसंही जेवण अजिबात चवदार नव्हतं. विहीणबाईंच्या- सायलीच्या आईच्या हातचं लोणचंच काय ते चांगलं लागत होतं. शेवटी घरचं ते घरचंच.
पण वसंतरावांना घरचं जेवण आता मिळणार नव्हतं. त्यांची पत्नी शालिनी आता या जगात नव्हती. शालिनीच्या आठवणीने आलेला अस्वस्थपणा बोचत असताना त्यांनी कसंबसं जेवण संपवलं, ताट-वाटी घासून ओटयावर उपडी घालून ठेवली, उरलेलं जेवण झाकून फ्रीजमध्ये टाकलं. टेबल पुसलं. इतकं काम शालिनी असताना त्यांना कधीच करावं लागलं नव्हतं.
शालिनी समर्थपणे स्वयंपाकघर सांभाळत असे. ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा होती. पुढे शैलेशचं लग्न झालं आणि सायली सून म्हणून घरात आली. शालिनीच्या हाताखाली शिकून तीही टापटिपीने स्वयंपाकघर चालवण्यात तरबेज झाली. शैलेश-सायलीच्या दोन मुलांमुळे घर हसू-खेळू लागलं. पण शालिनीचं अचानक अल्पशा आजाराने भरल्या संसारातून उठून जाणं, नंतर शैलेश-वसंतरावात शुल्लक कारणांमुळे वाढत गेलेला वाद आणि विसंवाद, शैलेशने सरळ मुंबईला नवीन नोकरी स्वीकारणं आणि बायकोपोरांना घेऊन तिकडेच भाडयाने फ्लॅट घेऊन  राहाणं- या सगळ्या घटनाक्रमानंतर आता वसंतराव पुण्यातल्या आनंद सोसायटीतल्या घरात एकटेच राहात होते. शैलेश-सायलीशी संपर्क उरला नव्हता. सायलीच्या पुण्यातच राहाणाऱ्या आईबाबांना वसंतरावांबद्दल आपुलकी होती- ते अधूनमधून भेटायला येत तेव्हा फक्त वसंतरावांना मुलानातवंडांची ख्यालीखुशाली कळत असे.

वसंतरावांनी सेवानिवृत्तीच्या आधीच आर्थिक गुंतवणूक उत्तम केली असल्यामुळे त्यांना आर्थिक चिंता नव्हती. त्यांचे खर्चही फार कमी होते. एक पुस्तकांची लायब्ररी सोडली तर त्यांना कसलंही व्यसन नव्हतं.
वसंतरावांना मित्र फारसे नव्हते. नातेवाईकांनी त्यांच्या शैलेशशी झालेल्या भांडणानंतर त्यांच्याशी संबंध कमी करुन शैलेश-सायलीशी मात्र चांगले संबंध ठेवले होते. आनंद सोसायटीतल्या रहिवाश्यांशीही वसंतरावांचा फारसा संबंध नव्हता. त्यांचा बराचसा वेळ पुस्तके-वृत्तपत्रे वाचणं, घरातली कामं करणं, टीव्ही बघणं यातच जात असे.

वसंतराव बेडरुममध्ये झोपायला गेले. जरा डुलकी लागलेली असताना त्यांना अचानक जाग आली. जवळच असलेल्या झोपडपट्टीतली मुलं रस्त्यावर खेळायला आली होती. त्यांचा आरडाओरडा चालू होता. झोप उडाल्यामुळे वसंतराव बाल्कनीत जाऊन उभे राहिले. समोरच्या बिल्डिंगमधल्या एक ऐंशीच्या पुढच्या वयाच्या आजी काकुळतीला येऊन मुलांना विनवत होत्या- "अरे पोरांनो, नका रे आरडाओरडा करु. आजोबांना बरं नाहीये अजिबात. आत्ता कुठे जरा झोप लागली आहे त्यांना. प्लीज ऐका ना जरा." मुलांनी आजींकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. वसंतरावांच्या डोक्यात तिडीक गेली. "अरे ए! काय चालवलंय तुम्ही? अजिबात खेळायचं नाही इथे. रस्ता आहे हा- मैदान नाही." त्यांनी वरुन आवाज चढवला. मुलांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं. मुलं आपापसात हिंदी बोलत होती. म्हणून मग "यहां पे मत खेलो- आवाज मत करो इतना-" वगैरे हिंदीमधूनही त्यांनी बोलून पाहिलं. पण मुलांनी काही लक्ष दिलं नाही. वसंतराव चडफडत आत आले. वास्तविक जवळच एक सोडून चांगली दोन मैदानं होती. पण ही मुलं गल्लीतच खेळायला येत- खेळण्यापेक्षा किंचाळणं आणि एकमेकांना जोरजोरात शिव्या देणं आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं यात त्यांना जास्त रस होता. मुलांचा दंगा वाढतच होता. चिडलेले वसंतराव स्वयंपाकघरात गेले. शालिनीने जमवलेल्या काचेच्या ग्लासेसचे आणि कपबश्यांचे अनेक सेट्स कपाटात होते. वसंतरावांनी वापरात नसलेल्या, जुन्या कपबश्यांचा एक संच बाहेर काढला. सकाळी नाश्त्यासाठी आणून ठेवलेली अंडीही उचलली. आणून ती अंडी नेम साधून मुलांवर मारली. मुलं कसली- सोळा-सतरा वर्षांचे टीनएजर्स होते ते. या हल्ल्याने ती गोंधळली. त्यांनी हल्ल्याच्या दिशेने वर पाहिलं. संतापाने लालबुंद झालेला गोरापान चेहरा. धगधगते, निखाऱ्यासारखे धुमसते घारेहिरवे डोळे. हातातला काचेचा कप रोखून वसंतराव पुढच्या हल्ल्यासाठी सज्ज उभे होते.
"अबे भाग रे- बुढ्ढा पागल हो गया है!" "चल दुसरी गलीमें जाके खेलते है!" मुलांनी एकमेकांना ओरडून सांगितलं आणि तिथून काढता पाय घेतला.
मुलांची पाठ वळल्यावर वसंतरावांनी कप-बश्या पुन्हा नीट शालिनीच्या कपाटात लावून ठेवल्या. समोरच्या सोसायटीतल्या आजींच्या आजोबांना बरं वाटलं असावं असं त्यांना उगाचच वाटलं आणि त्यामुळे समाधानही वाटलं.
’आनंद’मधले पांढरपेशा रहिवासी आपापल्या घरातून हा प्रकार बघत होते. वसंतराव नामक ’वेडसर’ म्हाताऱ्यामुळे एक चांगला टाईमपास सगळ्यांनाच मिळाला होता.


दिवसेगणिक वसंतरावांचा ’वेडसरपणा’ वाढत चालला होता. पाठीमागच्या गल्लीतली एक हाय-फाय मुलगी तिच्या कुत्र्याला घेऊन रोज ठराविक वेळी वॉकला यायची. आनंदच्या थोडं आधी असणाऱ्या एका फास्ट फूडच्या दुकानाशी तिचे मित्रमैत्रिणी उभे असायचे. त्यांच्याशी थोडावेळ बोलून ती कुत्र्याला घेऊन आनंदच्या गेटसमोर यायची. तो कुत्रा नेमका आनंदच्या गेटसमोर आल्यावर ’शी’ करायचा. मुलगी तशीच कुत्र्यासह पुढे सुरु व्हायची. वसंतरावांच्या हे लक्षात आल्यावर एक दिवस त्या वेळेला ते खालती हजर. मुलगी आणि कुत्रा दिसल्यावर त्यांनी पुढे होऊन तिला बजावले- "रस्ता आणि संडास यात फरक असतो हे कळत नाही का? कुत्र्याला शी स्वत:च्या घरात करायला सांगायची. आमच्या गेटसमोर याने घाण केली तर तुला ती उचलून बरोबर घेऊन जावी लागेल." मुलगी गोंधळून बघू लागली. तिला मराठी कळत नाही हे वसंतरावांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी तोच मजकूर इंग्रजीत सांगितला. मुलीने त्यांच्याकडे तुच्छतेने बघितले. "आप ज्यादा बकवास मत करो अंकल- फालतूमें टाईम वेस्ट मत करो- यहां के कॉर्पोरेटर मेरे पापा के दोस्त है." कुत्र्याने आजही शी केलीच. मुलगी तिथून निघून गेली. वसंतरावांनी शांतपणे सोबत आणलेल्या वर्तमानपत्रात सगळी घाण भरली आणि घरी घेऊन गेले.

मुलगी थोडया वेळाने त्याच रस्त्याने उलटी परत जात असे. तेव्हा वसंतरावांनी वरुन कुत्र्याची घाण त्या मस्तवाल मुलीच्या अंगावर फेकली.

"मेरा कोई नही है इस दुनिया मे- वाईफ मर गयी है. अकेला रहता हू. तुम्हारे कॉर्पोरेटर को बोलो मेरा खून कर देने को- आय डोन्ट केअर!" तिला सरळ आव्हान देऊन वसंतराव बाल्कनीतून हॉलमध्ये येऊन बसले. आनंद सोसायटी थक्क. फास्ट फूडच्या दुकानासमोरचे तिचे मित्रमैत्रिणी तिच्याकडे बघत होते पण किळस वाटून पटकन कोणी तिच्या मदतीलाही येईना. उलट सगळ्यांना हसू आवरत नव्हतं आणि तिच्यापासून आपलं हसू लपवण्याचा सगळ्यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरत होता. रस्त्यावरुन येणारे-जाणारे इतर लोकही नेहमीचेच. सगळी पार्श्वभूमी माहीत असलेले. त्यामुळे त्यांनाही तिच्याविषयी सहानुभूती न वाटता घडल्या प्रकाराची गंमत वाटत होती. सगळेजण आपल्याला हसत आहेत आणि आपण अगदीच एकटे पडले आहोत हे लक्षात घेऊन खाली मान घालून ती मुलगी जवळजवळ पळतच आपल्या सोसायटीकडे गेली. दुसऱ्या दिवसापासून ती कुत्रावाली मुलगी पुन्हा आनंदच्या गल्लीत फिरकली नाही.
"वेडसर म्हातारा" आता आनंद सोसायटीसाठी रोजची करमणूक होऊ लागला होता.

आनंदच्याच गल्लीत असलेल्या उमंग कनाकियांच्या बंगल्यात एक दिवस कसलासा समारंभ होता. मोठयामोठया महागडया गाडया घेऊन अतिश्रीमंत पाहुणे समारंभाला आले होते. आनंदच्या दारात लावलेल्या ’नो पार्किंग’ च्या भल्यामोठया पाटीला न जुमानता लोकांनी गाडया तिथेच लावायला सुरुवात केली. पार्किंग शोधण्याचे कष्ट कोण घेणार? आणि इथे फुकट पार्किंग मिळत असताना पे पार्किंगचा खर्च कोण करणार? वसंतरावांनी एकदा वरुन ओरडून सांगून पाहिलं पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. मग मात्र त्यांनी लोकांना गाडया लावण्यास विरोध केला नाही. मात्र अंधार पडल्यावर त्यांनी खाली जाऊन एकूणएक गाडया पंक्चर केल्या.
आनंदच्या तळमजल्यावर राहणाऱ्या तीस वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या समीपने वसंतरावांना हे काम करताना पाहिले होते. गाडया पंक्चर झाल्यात हे कळल्यावर पाहुण्यांपैकी काही जाडजूड इसम समीपच्या दारात येऊन उभे राहिले आणि पंक्चरबद्दल जाब विचारु लागले. "मी आत्ताच घरी आलोय कामावरुन - मला काही माहीत नाही- पण तिथे ’नो पार्किंग’ लिहिले होते- त्यामुळे गाडया लावल्यात कशाला तिथे तुम्ही मुळात?" समीपने वसंतरावांचे नाव न सांगता दार लावून घेतले.
पाहुण्यांचा होत असलेला चडफडाट, त्यांना बसलेला भुर्दंड, ’या निरुपद्रवी मराठी मध्यमवर्गीय एरियात आपलं कोण काय बिघडवणार?’ या समजुतीला घडल्या प्रकारामुळे बसलेला धक्का, बंगल्याचा मालक उमंग कनाकियाचा रागाने फुललेला चेहरा- एकंदरीत हाही एपिसोड आनंदवासीयांसाठी ’रिॲलिटी शो’ हून मोठी करमणूक ठरला.


वसंतराव रोज आता काहीना काही भांडण किंवा कुरापत करतच होते. आत्तापर्यंत ते सोसायटीबाहेरच्या लोकांशी भांडण करत होते. पण मग एक दिवस त्यांची वक्रदृष्टी आनंदवरच वळली. दुसऱ्या मजल्यावरचे देवधर कुटुंबिय एक दिवस नळ तसाच चालू ठेवून घराबाहेर गेले होते. अश्या वेळी आनंदच्या टाकीमधला पाण्याचा आधीच कमी असलेला साठा संपून जायचा आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत कोणाकडेच पाणी नसायचे. वसंतरावांनी स्वखर्चाने प्लंबर बोलवून देवधरांच्या घरात जाणारी पाण्याची लाईनच नादुरुस्त केली. हे सगळं होईपर्यंत देवधर घरी आले आणि वसंतरावांना जाब विचारु लागले. "आपल्या राज्यात लोकांना प्यायला पाणी नाहीये, आणि तुम्ही नळ तसाच चालू ठेवून सरळ निघून जाता? ही मस्ती? पाण्यावाचून तडफडा एक दिवस म्हणजे कळेल." वसंतराव तिथून निघून गेले. देवधरांनी दुसरा प्लंबर शोधून आणला आणि स्वत:चा पाणी पुरवठा पूर्ववत केला. त्यात त्यांचा बराच वेळ, श्रम आणि पैसाही खर्च झाला. आनंदवासीय तेव्हापासून घराबाहेर पडण्याआधी आपापल्या घरातले नळ मात्र आवर्जून तपासू लागले. उगाच वेडसर म्हाताऱ्याच्या तावडीत सापडण्याची कोणाची इच्छा नव्हती.

देवधर मात्र चिडले होते. हा वेडसर माणूस नको त्या उचापती करतो, बाहेरच्या लोकांशी भांडणे करतो त्याचा सोसायटीतल्या लोकांना त्रास होईल, झोपडीपट्टीतले उदयोन्मुख दादा-लोक, परिसरातले राजकारण्यांशी साटेलोटे असलेले श्रीमंत बंगलेवाले लोक- या सगळ्यांशीच हा वेडा पंगे घेतोय- हे सोसायटीसाठी चांगलं नाहीये- असं ते इतर आनंदवासीयांना सांगू लागले. वसंतरावांविरुध्द पोलिस तक्रार करावी, किंवा शैलेशशी संपर्क साधून ’त्यांना एकटं सोडणं धोकादायक आहे- त्यांना इथून ने’ असं त्याला निक्षून सांगावं- असं पिल्लू देवधरांनी सोडलं.

मात्र हे सगळं चालू असतानाच तिकडे मुंबईला सायली खूप अस्वस्थ होती. वसंतराव आणि शैलेशमधला दुरावा तिला बघवत नव्हता. मुळात तिला वसंतरावांविषयी खूप आदर आणि आपुलकी होती. तिचं आणि शैलेशचं लग्न रीतसर वधूवरसूचक मंडळातून स्थळ बघून ठरलं. लग्नात वसंतरावांनी कसलाही हुंडा, मानपान, देणीघेणी असल्या मागण्या केल्या नाहीत. ’आम्ही मुलाकडचे’ म्हणून तोरा स्वत: दाखवला तर नाहीच,पण इतर कोणाला दाखवूही दिला नाही. तिचे बाबा नको-नको म्हणत असतानाही लग्नाचा अर्धा खर्च वसंतरावांनी हट्टानी केला. लग्नानंतरही पित्याच्या मायेनेच ते सायलीशी वागत आले होते. शैलेश तर एकुलता एक मुलगा म्हणून त्यांचा खूपच लाडका होता. पण शुल्लक भांडणामुळे बाप आणि मुलगा डोक्यात राख घालून दोन दिशांना तोंडं करुन बसले होते.

तिची मुलं निरागसपणे आजोबांची आठवण काढायची. शैलेश बोलत नसला तरी त्याला होत असलेला त्रास सायलीला कळत होता. आधी आई अचानक गेली आणि आता वडील असून नसल्यासारखे. सायलीला तिच्या सासूची कमी प्रकर्षाने जाणवत होती. आज आई असत्या तर बाप-मुलगा असे दुरावले नसते- आईंनी असं घडूनच दिलं नसतं. पण आता त्या नाहीत तर सायलीलाच काहीतरी करुन दोघांना एकत्र आणायला हवं.

तिने हळूहळू शैलेशला समजावायला सुरुवात केली. झालं ते झालं, शेवटी ते तुझे बाबा आहेत, निदान आईंच्या आत्म्याला क्लेश होऊ नयेत, वगैरे वगैरे. त्यातच तिला एक पार्ट-टाईम नोकरीची चांगली संधी चालून आली.  मुलं आता तशी मोठी होती, शाळॆत जात होती पण सायली नोकरीवर गेल्यावर मुलांवर लक्ष ठेवायला घरात कोणीतरी वडिलधारं असतं तर बरं झालं असतं. जर वसंतराव मुंबईला आले, तर प्रश्नच मिटेल. मुलांनाही आजोबांचा लळा होताच. तिने शैलेशला हे सगळं समजावलं. सायलीला घराबाहेर पडता यावं, तिला स्वत:ची वेगळी ओळख असावी- अशी शैलेशचीही मनापासून इच्छा होती. अखेर शैलेश तयार झाला.


एक दिवस शैलेश, सायली आणि सायलीचे बाबा वसंतरावांच्या घरी आले. सायलीच्या बाबांनी मुत्सद्दी मध्यस्थाची भूमिका चोख पार पाडली. अखेर बापलेकात समेट झाला. नातवंडांच्या ओढीने वसंतराव मुंबईला यायला तयार झाले. चौथ्या दिवशी सामान बांधून वसंतराव मुंबईला रवाना झाले. शैलेशचा आलिशान प्रशस्त फ्लॅट अगरवाल टॉवरच्या सोळाव्या मजल्यावर होता. दोन-चार वॉचमन सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवायचे. इथे वसंतरावांना भांडण करण्यात तसा काही स्कोप नव्हता.

तीन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये एक बेडरुम वसंतरावांना देण्यात आली. आता त्यांना घरचं उत्तम जेवण मिळू लागलं. शैलेश-सायली त्यांचा मान ठेवून वागत, काळजी घेत. सिनेमाला, मॉलमध्ये शॉपिंगला, बाहेर जेवायला जाताना आग्रहाने सोबत घेऊन जात. आता वसंतरावांचा वेळ नातवंडांना सांभाळण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात जाऊ लागला. शिवाय घरातली आणि बाहेरची काही लहानसहान कामं त्यांनी आपण होऊन स्वत:वर घेतली होती. शक्य तितकी मदत मुलासुनेला करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी अभ्यास घ्यायला सुरुवात केल्यानंतर झालेल्या युनिट टेस्टमध्ये दोन्ही मुलांचे मार्क्स वाढले होते. एकंदरीत वसंतराव शैलेशकडे मजेत होते.

आनंद सोसायटीत सुरुवातीला लोकांना वाटलं की देवधरांनी खरंच वसंतरावांना घालवलं की काय? पण काही बायकांना सायली त्या दिवशी भेटली होती आणि सायली नोकरी करणार असल्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी वसंतराव मुंबईला जात असल्याचं तिने घाईघाईत सांगितलं होतं. त्यामुळे खरं कारण लोकांना कळलं. ’नातवंडांच्या निमित्ताने का होईना, वेडयाची ब्याद गेली एकदाची’ म्हणून लोकांनी आनंद व्यक्त केला. वसंतरावांचे आनंदमधले उपद्व्याप मात्र शैलेश-सायलीला अजिबात कळलेले नव्हते.
लवकरच आनंद सोसायटीचं जीवन मूळपदावर आलं. झोपडपट्टीतली पोरं येऊन दुपारी यथेच्छ दंगा करु लागली, ’नो पार्किंग’ ला न जुमानता गाडया दिवसदिवस उभ्या राहू लागल्या. पाण्याचा गैरवापर आणि त्यामुळे तुटवडा वाढला. आनंदसमोरचा रस्ता अस्वच्छ राहू लागला.

समीप ऑफिसात रात्रपाळी करुन घरी आला. त्याला असह्य झोप आली होती. एसी लावून त्याने बेडरुममध्ये ताणून दिली. पण पोरांच्या आरडाओरडयामुळे तो जागा झाला. वसंतरावांसारखं वागणं त्याला जमणारं नव्हतं. आता आपल्याला झोप येत असूनही झोपणं शक्य नाहीये हे स्वत:शी स्वीकारुन त्याने एचबीओवर चित्रपट लावला.  त्याचवेळी आपण वसंतरावांना मिस करतोय हे त्याने मनाशी कबूल केलं.
आनंदमधल्या इतर रहिवाश्यांची तीच परिस्थिती होती. वसंतराव तिथे असताना कोणीही त्यांना कधीही साथ दिली नव्हती. वसंतराव बनण्याची तर कोणाचीच इच्छा नव्हती. पण वसंतराव आयते मिळाले तर आनंद सोसायटीला आता हवे होते. देवधरांनासुध्दा.

Tuesday, February 19, 2013

फ्लॅशबॅक


परवा एक खण काही कारणामुळे उघडला. हा खण फारसा उघडलाच जात नाही कारण रोजच्या वापराच्या वस्तू तिथे मी ठेवत नाही. वापरात नसलेल्या वस्तू डम्प करण्यासाठीचा तो ’जंक ड्रॉवर’ आहे. तर त्यात मला एक जुना कोडॅकचा डिजिटल कॅमेरा सापडला. अगदी बॉक्स-पॅक केलेला.
लहानपणी आमच्या घरात एकच कॅमेरा होता. कोडॅकचाच अर्थात. त्यात रिळ भरायचं, फोटो काढायचे, मग ते रिळ दुकानात नेऊन दयायचं, मग काही दिवसांनी पाकिटात घालून फोटो यायचे. ते बघण्याची काय उत्सुकता असायची. मग ते फोटो अल्बममध्ये लावायचे. एका रिळात मोजकेच फोटो मावायचे त्यामुळॆ डोक्यात तो आकडा असायचा फोटो काढताना- आता वीस झाले, चारच राहिले, आता जरा जपूनच क्लिक केले पाहिजे, वगैरे.
मग जेव्हा डिजिटल कॅमेरे नवीन नवीन आले तेव्हा हा डिजिकॅम घेतला. पहिला-वहिला. तो कोडॅकचाच का घेतला? तर तो घ्यायला मी आणि बाबा गेलो होतो. आणि चांगला कॅमेरा ब्रॅंड म्हणजे कोडॅक असं बाबांचं मत असावं. तो कॅमेरा नवीन असताना खूप कौतुकाने आणि उत्साहाने वापरला गेला. मग काही वर्षांनी त्याला काहीतरी झालं आणि तो चालेनासा झाला. बॅटरी बदलणं वगैरे नेहमीचे उपाय केल्यावरही तो चालू झाला नाही तेव्हा घराजवळच्या एका दुकानात तो रिपेअर करायला नेला पण त्या माणसालाही तो चालू करता आला नाही असं काहीतरी मला अंधुकसं आठवत होतं. त्यावेळी मी तो उचलून नीट पॅक करुन (यूझर मॅन्यूअल, सीडी, USB केबल, चार्जर इत्यादी) त्या खणात टाकला असणार. दृष्टीआड ते सृष्टीआड.
आता मात्र ठरवलं- हा खोका सरळ उचलून टाकून दयावा. उगाच खणात जागा व्यापतोय. पण हे इलेक्ट्रोनिक वेस्ट. ते सरळ कचऱ्याच्या टोपलीत कसं टाकणार? म्हणजे टाकायला हरकत नव्हती, पण तरीही मी विचारात पडले. नवऱ्याशी बोलले. घराजवळच्या दुकानात नेऊन तो रिपेअर होतो का ते बघावं, नसेल होत तर फेकून दयावा असा सल्ला टीव्हीवरची नजर न काढता आणि रिमोटवरची पकड जराही सैल न करता त्याने दिला. घरात आता Nikon चा एक आणि Sony चा एक असे दोन चांगल्यापैकी डिजिकॅम्स आहेत. गेली काही वर्षं आम्ही तेच दोन कॅमेरे वापरतो आहोत. याशिवाय घरात मोबाईल फोन्स, डेस्कटॉप, लॅपटॉप, आयपॅड वगैरेमध्ये प्रत्येकी किमान एक डिजिटल कॅमेरा आहे- तसे एकूण आठ-नऊ कॅमेरे असतील. त्यामुळे त्या जुन्या कॅमेऱ्याची त्याला अजिबातच पर्वा असण्याचं कारण नव्हतं. घराजवळच्या दुकानातल्या माणसाला कॅमेरा मागेच दाखवून झाला होता. परत तिथे तो नेण्यात अर्थ नव्हता. इस्टमन कोडॅक कंपनीने काही वर्षांपूर्वी bankrupcy साठी file केलंय आणि डिजिटल कॅमेरा उत्पादन बंद केलंय असं माझ्या कानावर होतं. कोडॅक म्हणजे एकंदरित सगळा आनंदच होता.
मग मीच जरा त्यात डोकं घातलं. यूझर मॅन्यूअल उघडून नीट वाचलं. बॅटऱ्या बदलून बघितल्या. अगदी Nikon वाल्याच्या बॅटऱ्या काढून यात घालून बघितल्या. थपडा मारुन काहीही इलेक्ट्रोनिक गोष्टी चालू होतात हा एक माझा जुना विश्वास आहे. त्यामुळे तेही करुन झालं. मॅन्यूअलमध्ये दोन-चार trouble-shooting चे सल्ले दिले होते ते फॉलो केले. शेवटी नक्की काय उपाय लागू पडला माहीत नाही पण आमचे कोडॅक काका अचानक चालू झाले!
नक्की चालू आहे ना हे चेक करण्यासाठी सोफ्यावर लोळून टीव्ही बघणाऱ्या नवऱ्याचे एक-दोन फोटो काढले. (त्याच्या चेहऱ्यावरचे आळस, कंटाळा, आपले असे अनावश्यक फोटो का काढले जात आहेत याचं चिडखोर आश्चर्य, जुन्या कॅमेऱ्यामध्ये मी इतका रस घ्यावा -तेही घरात दोन जास्त चांगले डिजिकॅम्स असताना- याबद्दलची हतबुध्दता- हे सगळे भाव त्या फोटोत टिपले गेले.)
मग जरा जुने फोटो आहेत का ते erase झालेत ते बघावं म्हटलं.
तर जुने फोटोही होतेच की. कधीकाळची दिवाळी, भाऊबीजेला ओवाळण्याच्या पोझमध्ये मी आणि माझा भाऊ. नात्यातल्या एका लग्नाच्या दिवशीचे फोटो- सगळ्यांनी नवीन भारी साडयांमध्ये कौतुकाने दिलेल्या पोझेस. माझी त्यावेळी आवडीने घेतलेली गुलाबी साडी. आईची गच्चीवरची बाग, त्यातली विविध तरारलेली रोपं. भूतकाळाचा विस्मरणात गेलेला एक तुकडा त्या कॅमेऱ्याच्या मेमरी कार्डमध्ये लपलेला होता आणि अचानक माझ्या समोर आला होता.
आता मी तो कॅमेरा जपून ठेवलाय. मी तो आता नियमितपणे वापरणार आहे.
पण तरी प्रश्न आहेच. आजकाल आपण इतके फोटो काढतो. डिजिकॅम, फोन, टॅबलेट वापरुन. पण पुढे काय होतं? ते सगळे फोटो एका ठिकाणी - म्हणजे लॅपटॉपवर ट्रान्सफर करा, मग त्यातले नको असलेले उडवा, उरलेले जीमेल, फेसबुक वगैरेवर टाकले जातात. प्रिंट घ्यायचा कंटाळा येतो- कशाला खर्च आणि अडगळ म्हणून. पूर्वीच्या काळी जे कौतुक असायचं फोटोचं...नीट अल्बम्समध्ये जपून ठेवलेले, वारंवार पाहिले जाणारे मोजकेच फोटो. ते आता नाही राहिलंय. आपला ’problem of plenty' आहे का हा?
अनेक बाबतीत हे जाणवतं. पूर्वी ऑडियो कॅसेटवर मोजकी गाणी असायची. किंवा टीव्हीवर ठराविक वेळी गाणी लागायची. आता इंटरनेट, टीव्ही, आयपॉडच्या जमान्यात हवं ते गाणं लगेच उपलब्ध असतं. पण ती गाणी तितकी मन लावून, involve होऊन ऐकली जात नाहीत. लहानपणी घराजवळच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम कोन खाणं हा एक खास कार्यक्रम असायचा. आता कधीही आईस्क्रीम कोपऱ्यावरच्या वाण्याकडेही उपलब्ध असतं. किंवा फ्रीझरमध्ये मोठा डबा आणून ठेवता येतो. जास्त frequently खाल्लं जातं आईस्क्रीम पण त्यात ती पूर्वीची मजा नाही.
यातून कसं बाहेर पडायचं- याचाच विचार चाललाय सध्या.

Wednesday, January 16, 2013

परंपरा


श्रेया आणि रोहनचं लग्न ठरलं तेव्हा तिच्या आईबाबांना आनंद तर झालाच पण दडपणही तितकंच आलं. एकतर प्रेमविवाह. रोहनसारखा शिकलेला, स्मार्ट, हुशार (शिवाय जातीतला) जावई मिळाला-तोसुध्दा आपल्याला वरसंशोधनाचे कष्ट न पडता- याचा आनंद. आणि आपली हट्टी, लाडावलेली, इंग्रजाळलेली मुलगी सासरी जाऊन काय दिवे लावणार याचं दडपण.

पण श्रेया त्याबाबतीत नशिबवान. रोहनचे आईबाबा भलतेच प्रेमळ आणि सहनशील निघाले. त्यात त्यांना मुलगी नसल्यामुळे श्रेयालाच त्यांनी आपली मुलगी मानलं. वंदनाताईंनी तर श्रेयाच्या आईला साखरपुडयाच्या वेळीच सांगून टाकलं- "तुम्ही काही काळजी नका करु हो. मला मुलीची फार हौस होती. आता हीच आमची मुलगी."

थाटामाटात पारंपारिक मराठी पध्दतीने लग्न झालं. परदेशात मधुचंद्र झाला आणि श्रेया-रोहन दोघेही आपापल्या नोकऱ्यांमध्ये गुंग झाले. रोहनचे बाबा नुकतेच रिटायर झाले असले तरी त्यांना त्यांचं सोशलवर्क वगैरे असायचं. वंदनाताईंची नोकरी अजून चालू होती. श्रेयाचं लहान वयात मोठया जबाबदारीची नोकरी करणं, जमेल तेव्हा हौसेनी घरात इटालियन, चायनीज, पंजाबी वगैरे पदार्थ बनवणं, रोहनच्या सगळ्या नातेवाईकांशी आपलेपणाने वागणं- याचं रोहनच्या आईबाबांना भरपूर कौतुक होतं. एकंदरीत सासू-सुनेची भांडणं वगैरे न होता सगळे मजेत एकत्र राहात होते.

पावसाळा सुरु झाला आणि श्रावणाचे वेध लागले. रोहनच्या नात्यातल्या वडिलधाऱ्या बायकांनी आणि रोहनच्या आईने मिळून श्रेयाच्या पहिल्या मंगळागौरीचे प्लॅनिंग सुरु केले.
जसजशी प्लॅनिंगची स्केल वाढत गेली तशी श्रेया धास्तावली. तिला हे काहीही नको असायचं. "मंगळागौर- काय कटकट आहे- कशाला एकेक ड्रामा?" असं श्रेयाने स्वत:च्या आईकडे म्हणून पाहिलं. पण आईने तिला लग्नाच्या वेळीच बजावलं होतं की सासरी मोठया माणसांचं ऐकायचं, जास्त अक्कल पाजळायची नाही- त्याचीच तिने श्रेयाला परत आठवण करुन दिली.

अखेर श्रेयाच्या मनाविरुध्द मंगळागौरीचा मोठ्ठा घाट घातला गेला. नात्यागोत्यातल्या, अगदी जवळच्या म्हटलं तरी पन्नाससाठ बायकांना आमंत्रण गेलं. पुरणपोळ्यांची ऑर्डर गेली. बाकीचा मेन्यू ठरवला गेला. वशेळया गोळा केल्या गेल्या. पूजेसाठी भटजींना बोलावणे गेले.  श्रेयाने ऑफिसातून सुट्टी काढली. रात्री जागरण करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. कारण एकतर तिला मंगळागौरीचे खेळ अजिबात खेळता येत नव्हते आणि रात्री जागरण केल्यावर मग दुसऱ्या दिवशीही रजा घ्यावी लागली असती, जे शक्य नव्हतं. शिवाय मंगळागौर जागवायला तिच्या कोणी मैत्रिणी किंवा बहिणीही येऊ शकल्या नसत्या. जो तो आपापल्या व्यापात बिझी. यावर रोहनच्या मावशीकडे तोडगा तयारच होता- "आपण मंगळागौर खेळणाऱ्या बायकांचा ग्रुप बोलवू या. त्या पैसे घेऊन कार्यक्रम करतात. मात्र त्यांना आधीच ’बुक’ करावं लागेल हं."
अनोळखी बायका आपल्या घरी येऊन आपल्यासोबत मंगळागौर खेळणार हे श्रेयाला पचनी पडण्यासारखे नव्हते. तिने त्या कल्पनेला विरोध केला.
"ते खेळबिळ नको हं. एकतर दिवसभराच्या फंक्शननंतर दमायला होईल खूप." तिने कुरकुर केली. "हो तेही आहेच. राहू दे मग जागरण." वंदनाताईंनी तिचं म्हणणं उचलून धरलं.

श्रेयाने मंगळागौरीला नऊवारी साडी नेसावी हे तिच्या सासूबाईंनी ठरवलं. "अहो आई कशाला उगाच? नऊवारी साडी मला नेसता येणार आहे का? कोण नेसवणार मला? तुम्ही?" श्रेयाचा आवाज अधिकाधिक त्रासिक होत गेलेला.
 "अगं तीच तर गंमत आहे!" वंदनाताईंच्या चेहऱ्यावर हसू. "तू शिवलेली नऊवारी नेसणार आहेस. माझ्या ओळखीच्या एक बाई शिवून देतात."
मग साडी खरेदी झाली. ती जरीकाठाची महागाची साडी शिवण्यासाठी फाडली जाणार हे श्रेयाला आवडलं नव्हतं पण आता सगळं थांबवण्याच्या पलीकडे कधीच गेलं होतं. तिची मोजमापं घेऊन साडी शिवण्यात आली. ब्लाऊज शिवायलाही टाकला. सासूबाईंनी आणि आईने तिच्यासाठी नवीन दागिने करुन घेतले. त्या दोघींकडून मंगळागौरीच्या गिफ्ट्स म्हणून. "मजा आहे बुवा तुझी- नवीन अंगठी काय- कानातले काय!" रोहन तिला चिडवत म्हणाला.
"सोन्याचे दागिने- It makes sense...investment पण होते ना ती." ती स्वत:लाच स्पष्टीकरण देत म्हणाली.

मंगळागौरीचा दिवस उजाडला. नेमकं आदल्या दिवशी श्रेयाला ऑफिसात तातडीचं काम आलं होतं. तिचा खाष्ट बॉस मागे लागला की उदया सुट्टी रद्द कर आणि ऑफिसला ये.  मंगळागौरीच्या दिवशीची रजा रद्द करणं शक्य नसल्यामुळे तिने कसंबसं बॉसला समजावलं होतं की ती रात्री जागून घरुन काम पूर्ण करुन देईल. काम होऊन तिने शेवटची ईमेल पाठवली तोपर्यंत रात्रीचे दोन वाजून गेले होते. त्यात सकाळी लवकर उठून नऊवारी नेसून तयार व्हायला लागलं होतं. पूजा चालू असताना श्रेयाला प्रचंड झोप येत होती. नाकातली नथ टोचत होती. यांत्रिकपणे ती पूजाविधी करत होती. तिच्यासोबत असलेल्या वशेळ्या मुलींशी तिची फारशी ओळख नव्हती. त्यांच्याशी थोडंफार औपचारिकपणे बोलून जांभया आवरत तिने पूजा नेटाने चालू ठेवली. रोहननेही आज रजा टाकली होती. तो कॅमेऱ्यातून तिचे फोटो काढण्यात मग्न होता. तो हळूच तिच्या मागे येऊन उभा राहिला. "अगं ए- फोटो काढतोय मी. जरा चेहऱ्यावर हसू ठेव ना. जांभया देऊ नको. जरा चांगले फोटो येऊ देत की- हॉट दिसते आहेस तू नऊवारीत." त्याचं शेवटचं वाक्य भटजीबुवांनी तर ऐकलं नाही ना, असं वाटून तिने घाबरुन भटजींकडे बघितलं तर ते आपले एकाग्रतेने त्यांच्या मोबाईलवर बोलत होते.
नातेवाईकांनी घर भरुन गेलं होतं. तिच्या सासूबाई, आई स्वयंपाकघरात कामात होत्या. तिचे सासरे आणि बाबा पूजेच्या सामानाची तयारी पूर्ण करुन आता चहा घेत गप्पा मारत बसले होते. जेवायला पुरणपोळी, मसालेभात, उकडलेल्या बटाटयाची भाजी असा अस्सल मराठी बेत होता. त्यात काही बायकांचा उपास होता. श्रेया कधीच उपास करत नसे. उपास केला की तिला कसंतरीच व्हायचं. त्यामुळे तिने व्यवस्थित जेवून घेतलं.
दुपारची जेवणं झाल्यावर मंडळी लगेच संध्याकाळच्या तयारीला लागली कारण संध्याकाळी खूप बायका येणार होत्या. संध्याकाळी नऊवारीच्या ऐवजी श्रेयाने आणखी एक काठपदराची भारीतली साडी नेसली. एकीकडे नजर घडयाळाकडे होती- की कधी हा सगळा प्रकार आवरतोय. घरभर माणसंच माणसं, कोणाच्या गप्पा चालल्यायत, एकीकडे स्वयंपाकघरातून खाण्याच्या प्लेट्स भरभरुन बाहेर आणल्या जातायत, कोणी श्रेयाच्या साडीचं, दागिन्यांचं कौतुक करतंय- श्रेया प्रचंड थकून गेली होती. सगळी पाहुणेमंडळी परतली. अंदाजापेक्षा जास्त माणसं आल्यामुळे म्हणे खाण्याच्या ऑर्डरचा अंदाज चुकला. पाहुण्यांपैकी कोणाला काही कमी पडलं नाही पण घरच्यांसाठी फारसं काही खायला उरलं नव्हतं. रोहनने लगेच फोन करुन हॉटेलातून जेवण मागवलं. श्रेया इतकी दमली होती की थोडंसं काहीतरी पोटात ढकलून ती झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात दुपारी ’टी ब्रेक’ घेताना तिने मनात कालच्या समारंभाचा आढावा घेतला- कोणासाठी केला गेला कालचा समारंभ? तिच्यासाठी? तिला तर काही रसच नव्हता. सासूबाईंचीच हौस सगळी. त्यांची हौस पुरविण्यासाठी इच्छा नसतानाही तिला या सगळ्यात भाग घ्यावा लागला होता.

त्यानंतर काही दिवसांनी ती आईकडे राहायला गेली होती. मंगळागौरीचा विषय निघालाच. श्रेयाच्या कपाळावर लगेच आठया.
"तुला माहित्ये ना आई- मला असल्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नसतो. मला खरं तर लग्नही रजिस्टर करायचं होतं. पण रोहनच्या घरच्यांना हिंदू पध्दतीचं साग्रसंगीत लग्न हवं होतं म्हणून मी तयार झाले. वाटलं होतं- हे सगळं लग्नापुरतंच मर्यादित असेल. पण कसलं काय!"
"अगं पण- या सगळ्या परंपरांमध्ये- रिच्युअल्समध्ये- खूप मोठा अर्थ सामावलेला असतो." आई म्हणाली. श्रेयाने तिच्याकडे रागानेच पाहिलं. पण आई आता तिला ऐकवायला सज्जच झाली होती.
"पूर्वीच्या काळी -अगं -बायकांना घराबाहेरही पडायला मिळत नसे. तुम्हाला आजकालच्या मुलींना काय कळणार ते सगळं? इतके हाल व्हायचे बायकांचे पूर्वी. मग या मंगळागौरीच्या निमित्ताने त्या घराबाहेर पडत. मंगळागौरीचे खेळ खेळण्याच्या निमित्ताने जरा मजा करत. ओळखी होत. शिवाय- ती मंगळागौरीला वेगवेगळ्या प्रकारची पानं-पत्री गोळा करतात-"
"ह्ह्म....ते रोहनच्या मामीने आणलं होतं सगळं-"
"तर त्यामुळे त्या मुली निसर्गाच्या सहवासात जाऊ शकत. त्यांना माहिती होत असे त्या पत्रींची- त्यांचे औषधी उपयोग वगैरे-"
"मॉम कम ऑन! हे सगळं त्या काळी ठीक होतं. पण आता मला काय उपयोग याचा. मी रोजच घराबाहेर पडते. माझे फ्रेन्ड्स तर फेसबुकवरच जास्त भेटतात मला. मला नेटवर्किंगसाठी मंगळागौरीची गरज नाहीये. किंवा मला ते मंगळागौरीचे गेम्स खेळायची पण गरज नाहीये. मी जिममध्ये जाते स्वत:ला फिट ठेवायला. आणि ॲज फार ॲज पत्री इज कन्सर्न्ड, मी ते सगळं स्कूलमध्ये बॉटनीमध्ये शिकले आहे ऑलरेडी. तुला माहितेय ना- स्कूलमध्ये मी प्रोजेक्ट पण केला होता - प्लान्ट्सच्या उपयोगांबद्दल."
श्रेयाच्या बोलण्यापुढे आईने शरणागती पत्करली.
"हे बघ- ते काहीही असलं तरी रोहनच्या आईचं मन राखण्यासाठी म्हणून तू मंगळागौर करण्यात काही बिघडलं नाहीये. जरा दुसऱ्याचा विचार करावा की." आईने तिला सुनावलं.
श्रेयाने रागारागात मान हलवली. "मला भूक लागलीय. आणि मला चहा हवाय." ती आईला म्हणाली.
"चहाबरोबर टोस्ट खाणारेस ना तू?" आईने स्वयंपाकघरात जाता जाता विचारलं.
"हो. बटर लाव पण भरपूर. कंजूषपणा नको करुस नेहमीसारखा." आईच्या हातचा आयता चहा-नाश्ता मिळणार असल्याच्या आनंदात श्रेया मंगळागौरीचा विषय विसरली.

असेच दिवस जात राहिले. श्रेया आता सासरी रुळली होती. दिवाळसण तिच्या आईबाबांनी दणक्यात साजरा केला. मग लगेचच आलेला लग्नाचा वाढदिवस मात्र श्रेया-रोहनच्या पध्दतीने- म्हणजे केक कापून आणि हॉटेलात सामिष आहाराची पार्टी करुन साजरा झाला.
आणि मग एकदा रविवार दुपारचा चहा चालू असताना संक्रांतीचा सण करण्याची चर्चा सुरु झाली.
"आता कसला सण? लग्नाला एक वर्षं झालंय आता." श्रेया धास्तावून म्हणाली.
"तुमच्या लग्नानंतर संक्रांतीचा सण पहिलाच आला होता. पहिलाच सण काळा नसतो करायचा. म्हणून केला नाही. आता यावर्षी करायचा. हलव्याचे दागिने, संक्रांतीचं हळदीकुंकू-" वंदनाताई शांतपणे म्हणाल्या.
"हलव्याचे दागिने घालून काय कार्टून दिसशील तू श्रेया-" रोहनला हसू कोसळलं.
श्रेयाने त्याच्याकडे रागारागाने पाहिलं.
"रोहन!" त्याच्या बाबांनी त्याला दटावलं. पण तो कसला ऐकतोय. "अहो बाबा, चांगली आयडिया आहे की नाही- मी हिचे हलव्याचे दागिने घातलेले फोटो फेसबुकवर अपलोड करतो."
श्रेयाच्या रागाचा पारा आता चढला होता. तिचा नवरा आता सरळसरळ धमक्या देत होता- ते सुध्दा त्याच्या आईबाबांच्या समोर.
"याला नसतात का दयायचे हलव्याचे दागिने?" श्रेयाने वंदनाताईंना विचारलं.
"अं हो. म्हणजे तसा तो बायकांचाच सण असतो पण काही काही लोक जावयाला हार घालतात हलव्याचा." वंदनाताई म्हणाल्या.
"गुड. मी सांगते माझ्या आईला- मोठ्ठा हार घेऊन ये ह्याला घालायला म्हणून. ॲन्ड देन स्ट्रेट टू एफबी इट गोज-" श्रेयाला स्फुरण चढलं.
"ए गप- मी नाही घालणार हार-बिर - मी आधीच सांगून ठेवतोय हं आई- जे काय करायचं ते श्रेया आणि तुझं बायका-बायकांचं चालू दे- मी सरळ ऑफिसला निघून जाईन. आणि मी हलव्याचे दागिने तर अजिबात घालणार नाही." रोहनचा आवाज चढला.
"हो कळलं रे. उगाच आरडाओरडा कशाला करतोय?" आईने रोहनला झापलं.

त्यावेळपुरता तो विषय संपला असला तरी सासूबाईंचं आणि रोहनच्या मावशी-मामी-आत्या कंपनीचं बोलणं श्रेयाच्या कानावर पडतच होतं. श्रेयासाठी काळी साडी कुठून घ्यायची, कोणाकोणाला बोलवायचं, तिळाचे लाडू आणायचे की वडया, गुळाच्या पोळ्या कुठे ऑर्डर करायच्या, हलव्याचे दागिने विकत आणायचे का घरी करायचे वगैरे. श्रेयाने आता मनाशी काहीएक निश्चय केला होता.
एक दिवस ती आणि वंदनाताई दोघीच घरात होत्या. श्रेयाने दोघींसाठी चहा करुन आणला. आणि मग हळूच विषय काढला.
"आई, मला ना ते संक्रांत सण वगैरे करण्यात काही इंटरेस्ट नाहीये हो. मला ते हलव्याचे दागिने घालून फोटो-बिटो काढणं आवडत नाही. म्हणजे लहान मुलांना घालतात ते ठीक आहे. क्यूट दिसतात बेबीज वगैरे त्यात. बट इट इज नॉट फॉर मी. म्हणजे मला दागिन्यांची हौस आहे हे खरं- पण ते गोन्ड, डायमंड वगैरे. ती investment पण होते ना. हलव्याच्या दागिन्यांत मला इंटरेस्ट नाहीये. आपण हे नाही केलं तर नाही का चालणार? एकतर ऑफिसातही खूप काम आहे मला सध्या."
वंदनाताई बघतच राहिल्या तिच्याकडे.
"अगं पण अचानक काय झालं तुला? मंगळागौरीच्या वेळी तर किती हौसेने तू-"
"हौस? तेव्हापण मला काही हौस वगैरे नव्हती. पण तुमचं मन कसं मोडायचं म्हणून- I just went with the whole thing - you know-"
वंदनाताईंचा चेहरा एकदम विचारात पडल्यासारखा झाला. त्या आता चिडणार की काय, टीव्हीवरच्या त्या स्टुपिड सास-बहु सोपमधल्या मदर-इन-लॉसारख्या तर त्या वागणार नाहीत ना, असा श्रेयाला प्रश्न पडला.
पण मग त्यांचा चेहरा निवळला, एकदम रिलॅक्स झाल्या त्या. कसलंतरी ओझं उतरल्यासारख्या. आणि प्रेमाने तिच्याकडे बघून हसल्या. श्रेयाला हायसं वाटलं.
"तुला खरं सांगू का श्रेया, अगं मला पण अजिबात हौस नाहीये या सगळ्याची. मी इतकी शिकले, नोकरी करायला लागले. माझे विचार पुरोगामीच झाले होते त्यामुळे. रोहनचे बाबाही आपली मतं दुसऱ्यावर लादणारे अजिबात नाहीत. पण लग्नानंतर कसं झालं- माझे आईवडिल तसे सामान्य परिस्थितीतले. मध्यमवर्गीय, खाऊन-पिऊन सुखी. साधी राहणी, उच्च विचारसरणी असे. आणि रोहनचे बाबा मात्र आमच्या तुलनेत श्रीमंतच. मग काय- माझ्या सासूबाईंना अगदी थाटामाटात माझे सगळे सण साजरे करायचे होते. मंगळागौर काय, संक्रांत काय- अगदी एखादया लग्नाबिग्नासारखे त्यांनी माझे सण साजरे केले. मला काही फारशी हौस नव्हती. पण मीही त्यांचं मन मोडलं नाही. आमच्या काळात अशी पध्दत नव्हतीच- सासूसासऱ्यांसमोर तोंड उघडण्याचीच हिंमत नसायची आमची. त्यात मी म्हणजे गरिबाघरची मुलगी करुन आणलेली. त्यामुळे मला हे सगळं मिळतंय, माझं असं कौतुक होतंय यातच मला धन्य धन्य वाटायला हवं अशीच सगळ्यांची अपेक्षा. खूप वर्षं झाली आता त्या सगळ्याला. आता तुमचं लग्न झालं तेव्हा मला वाटलं की तुला सगळे सण साजरे करण्याची हौस, आवड असेल. शिवाय माझ्या सासूने माझे सण केले म्हणजे मी तुझे सण तशाच थाटामाटात साजरे करणं हे माझं कर्तव्यच वाटलं मला."

श्रेया थक्क होऊन बघतच राहिली. "म्हणजे आपल्याला दोघींनाही फारशी हौस नाहीये म्हणायची! Awesome. मग आता आपण हा काही घाट घालायलाच नको." तिने लगेच उत्साहात सूतोवाच केले.
"तसं नाही श्रेया. आता ऑलरेडी मावशी, मामी, आत्या, तुझी आई, तुझी मावशी- सगळ्या जणी उत्साहाने तयारीला लागलायत तुझ्या संक्रांत सणाच्या. आपण आता त्यांचं मन मोडायला नको. यावेळी हे फंक्शन होऊन जाऊ दे. मग पुढल्या वेळपासून आपण दोघी ठरवून आपल्या पध्दतीने प्लॅन करु सगळं."
"म्हणजे- एखादया अनाथाश्रमात भेट देणं, साधेपणानी सेलिब्रेशन करणं, जर लोकांना जेवायला बोलावायचं असेल तर घरी घाट न घालता चांगल्याशा हॉटेलात पार्टी देणं, आपल्याला मनापासून करावीशी वाटेल तेव्हाच पूजा करणं- असं?" श्रेयाने विचारलं.
"होय. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी ते सेलिब्रेशन असेल, त्या व्यक्तीला जसं हवं असेल तसं." सासूबाईंनी मान डोलावली.
"ओके डन. पण यावेळी मीही येणार तुमच्या बरोबर काळी साडी विकत घ्यायला." श्रेयाने जोरदार अनुमोदन दिलं.
"अगं ये की. तुलाच एरवी वेळ नसतो आणि इंटरेस्ट नसतो म्हणून आम्ही बोलावत नाही तुला शॉपिंगला." सासूबाई उत्साहाने म्हणाल्या.
चहाचा घोट घेताना श्रेयाच्या मनात समाधान भरुन आलं होतं.

Thursday, November 22, 2012

निर्णय


प्रिया दुपारच्या उन्हात रिक्षात बसून निनादचं घर शोधत होती. मनात चरफडत तिने रिक्षा सोडली, रिक्षावाल्याला पैसे दिले आणि आता निनादची सोसायटी चालतच शोधण्याचा निश्चय केला. निनाद साने तिच्याच इंजिनियरिंग कॉलेजमध्ये होता, पण वेगळ्या शाखेत. त्याला कॅंपस मुलाखतीतून एका बडया आयटी कंपनीत नोकरी मिळाल्याबद्दल आज दुपारी त्याच्या घरी खास जेवणाची पार्टी होती. वास्तविक निनाद हा तिचा काही खास मित्र वगैरे नव्हता. पण प्रज्ञा देवधर त्याची गर्लफेंड, आणि प्रिया प्रज्ञाची जवळची मैत्रिण. म्हणून या पार्टीत प्रियालाही आमंत्रण मिळाले होते आणि प्रज्ञाच्या धाकामुळे ती मुकाटयाने आलीही होती. शेवटी दोन वेळा चुकीच्या दिशेने जाऊन आल्यावर एकदाचे निनादचे घर सापडले.
निनादच्या घरी प्रज्ञा आधीच आलेली होती आणि निनादच्या आईला स्वयंपाकघरात मदत करत होती. निनाद म्हणे जेवणासाठी खास ऑर्डर केलेले सामोसे वगैरे आणायला बाहेर गेला होता. दिवाणखान्यात निनादच्या वर्गातली एक मुलगी आणि दोन मुलगे बसून गप्पा मारत होते. प्रियाने त्यांच्या गप्पांत सामील होण्याचा प्रयत्न केला. पण तिची त्या मंडळींची फारशी ओळख नव्हती आणि त्या मुलांनीही तिची ओळख करुन घेण्यात रस दाखवला नाही. तिने एकदा स्वयंपाकघरात जावं असा विचार केला. पण प्रज्ञाला निनादच्या आईशी त्या एकटया असताना बोलण्याची, इंप्रेशन पाडण्याची चांगली संधी मिळालेली असताना आपण उगाच तिथे जाणं तिला योग्य वाटेना.
निनादचे बाबा दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात बसले होते. त्यांच्या समोर पीसी होता आणि कसलंसं भविष्यविषयक सॉफ्टवेअर स्क्रीनवर दिसत होतं. निनादचे बाबा पत्रिका पाहतात हे तिला माहीत होतं. इंजिनियरिंग कंपनीतली नोकरी करुन फावल्या वेळात ते पत्रिका बघतात, त्यांच्याकडे पत्रिका बनवण्याचं सॉफ्टवेअर आहे, पण ते जास्तकरुन ओळखीच्या लोकांच्याच पत्रिका बघतात, जे भविष्य असेल ते चांगलं-वाईट कसंही असलं तरी स्पष्टपणे सांगतात, ते पैसे अजिबात घेत नाहीत, व्यवसाय म्हणून त्यांनी भविष्य सांगण्याचं दुकान थाटलेलं नाही- हे सगळं प्रज्ञाकडून तिला मागेच कळलेलं होतं.
एकटं गप्प बसून निनादच्या फ्रेन्ड्सच्या गप्पा ऐकून प्रिया कंटाळली. सहजच निनादच्या बाबांच्या जवळ जाऊन तिने विचारलं- "काका, माझी पत्रिका पण बघाल तुम्ही?"
निनादच्या बाबांनी पीसीवरची नजर आता तिच्याकडे वळवली. "तुझ्याकडे जन्मतारीख, वेळ आणि स्थळ हे डिटेल्स असले तर नक्कीच बघता येईल की!" ते हसून म्हणाले.
निनादसारखेच त्याचे बाबा पण उंच होते. उमदं व्यक्तिमत्व, बारीक कापलेले रुपेरी केस, गोरा रंग, हसरे डोळे, बारीक सोनेरी काडयांचा चष्मा, टी-शर्ट आणि जीन्स घातलेले, प्रेमळ हसणारे निनादचे बाबा तिला खूप आवडले. तिच्या बाबांसारखेच वाटले ते तिला. मुलांशी उगाच तुसडेपणाने न वागता प्रेमाने वागणारे. त्यांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज झळकत होतं.
तिची जन्मतारीख आणि स्थळ तर तिच्या लक्षात होतंच. जन्मवेळही नेमकी आठवली तिला. मग ते सगळे डिटेल्स निनादच्या बाबांना- म्ह्णजे साने काकांना दिल्यावर त्यांनी तिची पत्रिका बनवली.
"हं...काय जाणून घ्यायचंय तुला?" ते म्हणाले.
तिला काही सुचेचना. "अं...मला...म्हणजे...अं..मला कॅंपस इंटरव्ह्यूमधून नोकरी कधी लागेल?" ती बोलून गेली.
काकांनी पाच-दहा मिनिटं पत्रिका पाहिली. डायरी उघडून त्यात काहीतरी आकडेमोड वगैरे केली. "कँपसमधून नाही लागणार तुला नोकरी. नंतर मिळेल. एक ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर या काळात. पण चांगली नोकरी असेल ती." काका म्हणाले.
तेव्हढयात निनाद खाण्याचे पदार्थ घेऊन आला. बाकी सगळा स्वयंपाक तयार होता म्हणून निनादच्या आईने सगळ्यांना लगेच जेवायला बोलावलं. प्रियाचं सानेकाकांशी नंतर पत्रिकेबद्दल काहीच बोलणं झालं नाही.
घरी गेल्यावर त्यांच्या भविष्याचा शांतपणे विचार केल्यावर तिला रागच आला. लोकांना शेवटचं सेमिस्टर व्हायच्या आधीच नोकरी मिळते. आणि आपल्याला इतक्या उशीरा- नोव्हेंबरमध्ये मिळणार म्हणे. तिने सानेकाकांच्या भविष्याकडे दुर्लक्ष करुन भरपूर मेहनत करुन कॅंपसमधूनच नोकरी मिळवायचं ठरवलं. पण त्यावर्षी कॅंपसमध्ये फारच थोडया कंपन्या आल्या आणि तिची डाळ कुठे शिजलीच नाही. परीक्षा झाल्यावर नोकरी शोधण्याचा तिने कसून प्रयत्न सुरु केला. पण कुठे नोकरी मिळेचना. ती निराश होऊ लागली. बघता बघता नोव्हेंबरचेही पंधरा दिवस उलटले. सानेकाकांचं वीस नोव्हेंबरचं भाकीतही खोटं ठरणार असंच तिला वाटू लागलं.
सतरा तारखेला एका लहानशा आयटी कंपनीतून तिला कॉल आला- आजच मुलाखतीला ये म्हणून. तिने त्या कंपनीचं आधी कधी नावही ऐकलं नव्हतं. तिचा CV त्यांना कुठे मिळाला हेही त्यांना सांगता आलं नाही. पण तिचा CV त्यांच्याकडे होता आणि त्यांनी तिला तातडीने मुलाखतीला बोलावलं होतं. आता तिला इतकं नैराश्य आलं होतं की अजिबात अपेक्षा न ठेवता पाय ओढत ओढत कंटाळलेल्या मन:स्थितीतच ती त्यांच्या ऑफिसमध्ये गेली. मुलाखत सुरळीतपणे पार पडली आणि दुसऱ्या दिवशीच- अठरा तारखेला- त्यांच्याकडून फोन आला. तिला नोकरी मिळाली होती. कंपनीची एकच अट होती. त्यांची एक ट्रेनिंगची बॅच वीस तारखेपासून सुरु होत होती- त्यात प्रियाही असणं गरजेचं असल्यामुळे तिने उदयाच- एकोणीस तारखेलाच- जॉईन केलं पाहिजे. प्रियाने ही अट अगदी आनंदाने मान्य केली!
लहान कंपनी होती, पगारही तसा कमीच दिला होता. पण प्रियाला मिळालेलं प्रोफाईल चांगलं होतं, कंपनीतलं एकंदरीत वातावरण चांगलं होतं. प्रियाचा बॉसही चांगला होता. ठराविक तास- नऊ ते सहा- काम करायचं, कंपनीच्या बसने आरामात जायचं-यायचं. त्यामुळे प्रिया लवकरच नवीन नोकरीत रमली. पहिला पगार झाल्यावर आवर्जून पेढयांचा भलामोठा बॉक्स घेऊन सान्यांकडे गेली. ’वीस नोव्हेंबरच्या आत नोकरी मिळेल आणि ती चांगली असेल’ हे काकांचं भाकीत तंतोतंत खरं ठरलं होतं. काकाकाकूंनी तिचं अगत्याने स्वागत केलं, खायला-प्यायला घातलं आणि एक छानशी पर्सही काकूंनी तिला भेट म्हणून दिली.
अशीच काही वर्षं गेली. निनाद आता अमेरिकेला सेटल झाला होता. त्याचा प्रज्ञाशी साखरपुडा झाला होता. त्यांचं लग्न जवळ आलं होतं. प्रिया प्रज्ञासाठी खूष होती पण आपली मैत्रिण आता आपल्यापासून दूर अमेरिकेला जाणार याचं वाईटही वाटत होतं. एकदा लग्नाच्या साडीखरेदीनंतर प्रिया प्रज्ञाबरोबर निनादच्या घरी गेली. सानेकाका आणि काकू घरी होतेच. सानेकाकांना बघून प्रियाला एकदम भविष्याची आठवण झाली. तिच्या कंपनीतून एका प्रोजेक्टसाठी दहा लोकांना काही महिन्यांसाठी युकेला पाठवणार होते. युकेसाठी निवड झालेल्या त्या दहा भाग्यवान लोकांची नावं जाहीर व्हायला दीड महिना अवकाश होता. प्रियाचंही नाव विचारात घेतलं जाणार होतं. आपली निवड होईल असं तिला प्रकर्षाने वाटत होतं.
"काका, मला मिळेल का युकेला जायला?" तिने न राहवून सानेकाकांना विचारलं.
काकांनी पीसीमध्ये तिची पूर्वी करुन ठेवलेली पत्रिका उघडली. जुनी डायरी काढून त्यातलं तिचं पानही उघडलं. नीट अभ्यास करुन त्यांनी उत्तर दिलं- "नाही बेटा. तुझ्या पत्रिकेप्रमाणे तू काही सध्या परदेशात जाणार नाहीयेस. तू तशी अपेक्षा न ठेवलेलीच बरी."
प्रिया वैतागलीच! सानेकाकांचं बोलणं फारसं मनावर न घेता ती युकेसाठीची नावं घोषित होण्याची वाट बघू लागली. ज्या दिवशी नावं जाहीर होणार होती त्या दिवशी ती इतकी टेन्स होती की तिने ऑफिसला दांडीच मारली- बरं नाही असं सांगून. आणि संध्याकाळी सहाला तिच्या एका सहकाऱ्याचा फोन आला- युकेसाठी तिची निवड झाली होती! सानेकाकांचं भविष्य चक्क खोटं ठरलं होतं. पुढचा एक आठवडा ती हवेतच होती. युकेला जाण्यासाठी काय काय नवीन शॉपिंग करायचं, तिथून भारतात काय काय घेऊन यायचं हेच तिच्या डोक्यात घुमत होतं. आणि एक दिवस मॅनेजरने युकेच्या लिस्टमधल्या पाच जणांना मिटींगला बोलावलं. ती उत्साहाने मिटींग रुममध्ये शिरली. मॅनेजरचा सुतकी चेहरा बघून मात्र तिला कसंतरीच वाटलं. "क्लायंटनी प्रोजेक्टमध्ये काही बदल केलेत. त्यांना खूप प्रेशर आहे कॉस्ट कमी करण्याचं. आता ते म्हणतायत की ऑनसाईट दहा लोकांना आणण्यापेक्षा भारतातून जास्त काम करणं स्वस्त पडेल. त्यामुळे युकेला दहाऐवजी आता पाचच लोक जातील. त्यामुळे तुम्ही पाच जण जात नाही आहात. रियली सॉरी अबाऊट इट..पण संधी पुढेही मिळत राहतील..जरा मार्केट सुधारलं की-" मॅनेजर बरंच काही बोलत होता. तिच्या कानावर आता काही पडतच नव्हतं.
युकेला जात नसण्याच्या दु:खातून जरा सावरल्यावर मात्र तिच्या लक्षात आलं- सानेकाकांचं भविष्य अचूक ठरलं होतं. तिची निवड होऊनही शेवटी तिला जाता आलंच नव्हतं. हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. सानेकाकांच्या भविष्यावरचा तिचा विश्वास वाढला.

काही महिन्यांनी एप्रिल-मेचा लग्नसराईचा सीझन आला. निनाद-प्रज्ञाचं लग्न होतं. त्याचबरोबर प्रियाच्या ओळखीत, नात्यात आणखी तीन-चार लग्नं लागोपाठ होती. या सगळ्या लग्नांमध्ये घालण्यासाठी तिच्या आईने बरेच दागिने लॉकरमधून काढून आणले होते. प्रिया आणि आई दोघी चार-पाच लग्नांत ते दागिने घालून मिरवल्या. सीझनमधलं शेवटचं लग्न तर घरचंच- प्रियाच्या सख्ख्या मामेभावाचं. ते लग्न झाल्यावर आवराआवर करताना एकदम आईच्या लक्षात आलं- एक सोन्याचा नेकलेस गायब होता. घरभर शोधून झाला, मामाकडे फोन केला- तिथेही शोधाशोध झाली- पण नेकलेस सापडला नाही. सोन्याचा नेकलेस हरवणं म्हणजे आर्थिक नुकसान तर होतंच, पण प्रियाच्या आईचा तो जुना, अत्यंत आवडता नेकलेस होता. आजकाल तसले घसघशीत नेकलेस कोणी सोनार बनवतच नव्हते. प्रियाने एकदा सहज सानेकाकांना फोन करुन ही नेकलेसची समस्या सांगितली. "प्रश्नकुंडली मांडून सांगतो. मला पंधरा मिनिटांनी फोन कर." काका म्हणाले.
पंधरा मिनिटांनी फोन केल्यावर काकांचं उत्तर तयार होतं- "तो नेकलेस चोरलेला नाहीये- तो घरातच आहे. नीट शोधा म्हणजे सापडेल."
परत एकदा शोधाशोध केली, पण नेकलेसचा पत्ता नव्हता. नेकलेस गेल्याचं दु:ख आता सगळ्यांनी स्वीकारलं. प्रियाची आई दर थोडया दिवसांनी स्वयंपाकघर साफ करायची. एक दिवस असंच आवराआवरी करण्यासाठी स्वयंपाकघरातला एक ड्रॉवर तिने उघडला. त्यात नेहमी कापूर, सुपारी वगैरे पूजेशी संबंधित सामान असायचं. आज त्यात चक्क नेकलेसही होता. आईने भाच्याच्या लग्नानंतर घरी आल्यावर घाईघाईत स्वयंपाकघरातच नेकलेस ठेवला आणि नंतर साफ विसरुन गेली. रोजच्या पूजेला कापूर वगैरे लागत नसल्यामुळे तो ड्रॉवर काही रोज उघडला जात नसे. त्यामुळे नेकलेस त्यातच राहिला. नेकलेस मिळाल्यावर घरी आनंदीआनंद झाला. प्रियाने सानेकाकांना लगेच फोन करुन ही बातमी कळवली. त्यांच्या भविष्यावरचा तिचा विश्वास आणखी बळकट झाला होता.

आता प्रियासाठी वरसंशोधनाला सुरुवात झाली होती. नोकरीत ती चांगली रुळली होती. बघता बघता वय वर्षं सत्ताविस झालं होतं. आईबाबांनी आता तिच्या लग्नाचं चांगलंच मनावर घेतलं. मुलाकडची मंडळी पत्रिका मागत. तिला मंगळ होता. त्यामुळे अनेक जण नकार देत. मंगळ चालत असला, तरी पत्रिकेत किमान अठरा गुण जमायला हवेत अशीही अनेकांची अट असायचीच. ती एकदा खास फोन करुन अपॉईन्टमेन्ट घेऊन सानेकाकांना भेटून आली. "लग्नाचा योग आहे. प्रयत्न चालू देत." असं त्यांनी सांगितलं. "एखादं स्थळ असेल तर तू दोघांच्या पत्रिका घेऊन ये, मी बघून सांगेन काय ते. मंगळ, गुण बघणं, इतरही बरंच काही बघायचं असतं पत्रिका जुळवताना." ते शांतपणे म्हणाले. सानेकाकांशी बोलल्यावर नेहमीच तिला बरं वाटायचं, तसं आजही वाटलं. काकूंच्या हातची कॉफी पिऊन ती निघाली. "येत जा गं..प्रज्ञा इथे नसली म्हणून काय झालं..आम्ही आहोत ना. आम्ही दोघंच असतो आता. बरं वाटतं तुम्ही मुलं कोणी आलात की." काकू प्रेमाने म्हणाल्या. त्यांना वरचेवर यायचं आश्वासन देऊन ती घरी परतली.
तिचं कुठे काही जमत नव्हतं. कोणताच मुलगा ’क्लिक’ होत नव्हता. साने दांपत्य काही दिवसांनी प्रज्ञाच्या बाळंतपणासाठी शिकागोला रवाना झालं.
एक दिवस रात्री आईने तिच्या हाती एक कागद आणून दिला. त्यावर एक ईमेल आयडी होता. "आत्याने स्थळ आणलंय. तिला वधूवरसूचक मंडळात मिळालं. मुलगा सीए आहे. कुठल्याशा मोठया कंपनीत काम करतो. तुझ्यासारखाच त्यालाही मंगळ आहे. तू जरा तुझी पत्रिका आणि फोटो ईमेल कर बघू त्याला."
काहीशा अनिच्छेनेच तिने ईमेल पाठवली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून मेलबॉक्स उघडली तर समोर त्याचा रिप्लाय आलेला होता. तिने लंचब्रेकमध्ये कोणी आसपास नाहीये असं बघून हळूच त्याने पाठवलेली फाईल उघडली. आत पत्रिका होती, त्याचे फोटोही आणि त्याची माहिती. त्याचं नाव श्रीरंग. तिला पहिल्यापासून ते नाव खूप आवडायचं. तिने फोटोंवर नजर टाकली. उंच, स्मार्ट. दिसायला अगदी देखणा म्हणण्यासारखा नाही पण आकर्षक. एका फोटोत तो एका कारला रेलून उभा होता. त्याचीच कार असावी ती. मस्त गडद निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर. त्याची माहितीही होती त्या मेलमध्ये. बाप रे! बारावीत चक्क कॉमर्सच्या मेरिट लिस्टमध्ये आला होता तो. त्याची पत्रिका आणि जन्मतारीख, वेळ वगैरे त्याने पाठवलं होतंच. वर असंही लिहिलं होतं की त्याला पत्रिका बघायची नाहीये. सगळ्यात शेवटी त्याने लिहिलं होतं- "तुला चालणार असेल तर तुझा मोबाईल नंबर दे. मी फोन करेन. किंवा तू मला फोन कर." त्याचा नंबरही होता. तिने त्याला मेसेज केला. "हाय, धिस इज प्रिया. तुमची ईमेल मिळाली. तुम्हाला आज सात वाजता फोनवर बोलायला वेळ आहे का?" त्याचा क्षणार्धात रिप्लाय आला."येस..आय विल कॉल यू."
सातच्या ठोक्याला त्याचा फोन आला. त्याचा आवाज अगदी भारदस्त आणि पुरुषी होता. तिला खूप आवडला त्याचा आवाज. "मला ना, हे कांदे-पोहे प्रकरण काही झेपतच नाही. किती ऑकवर्ड वाटतं. त्यापेक्षा असं इन्फॉर्मल बोलणं-भेटणं बरं पडतं." तो म्हणाला. "मलाही तसंच वाटतं." प्रियाने त्याला लगेच अनुमती देऊन टाकली. जवळजवळ अर्धा तास त्यांच्या गप्पा रंगल्या. त्याने त्याच्याविषयी खूप माहिती दिली. कॉलेज कुठचं, सीए कधी झाला, कामाचं स्वरुप काय आहे, घरच्यांबद्दल माहिती, त्याचं एकंदरी रुटिन काय असतं, वगैरे. मध्येच- "सॉरी मी खूपच बोलतो ना. तूही सांग ना तुझ्याबद्दल." अशी तिला बोलायला मुभा दिली. तिने त्याला ’तुम्ही’ म्हणून संबोधित केल्यावर "तुम्ही???? आवरा!!! अगं मी फक्त दीड वर्षाने मोठा आहे तुझ्यापेक्षा-" असं म्हणून तिला अरे-तुरे करण्याची परवानगीही लगेच देऊन टाकली त्याने.
"आपण भेटू या का? घरच्यांबरोबर भेटण्याऐवजी एखादया कॉफी-शॉपमध्ये वगैरे?" त्याने आर्जवी स्वरात तिला विचारलं.
"अं..हो..चालेल की-" तिच्याही नकळत ती म्हणाली.
"हा आठवडा मला खूप काम आहे ऑफिसमध्ये. इन फॅक्ट आत्ताही मी ऑफिसमध्येच आहे. कदाचित वीकेन्डही वर्किंग असेल. सोमवारी एक डेडलाईन आहे. ती झाल्यावर आपण पुढच्या आठवडयात भेटू या का?"
"हो...तुला जमेल तसं." ती सहजपणे म्हणाली.
रात्री झोपायला गेल्यावर सारखा त्याचाच आवाज आठवत होता तिला..माय गॉड....कसला सेक्सी आवाज लाभलाय त्याला. त्याच्या विचारात ती असताना त्याचा मेसेज आला- "Just reached home. It was really nice talking to you. Looking forward to meeting you in person next week. Good night and sweet dreams :)"
म्हणजे तोही आत्ता तिचाच विचार करत होता तर! त्याला रिप्लाय करुन ती झोपली. पुढचे तीन-चार दिवस रुटीनचेच असले तरी जरा खास होते. दिवसभरात दोघांमध्ये मेसेजेसची देवाणघेवाण व्हायची. पहिल्या दिवशी बोलताना त्याने त्याच्या कॉलेजचं नाव सांगितलं होतं. तिची चुलत बहीण स्वप्नाही त्याच कॉलेजमध्ये, श्रीरंगच्याच बॅचमध्ये होती. प्रियाने लगेच तिच्या स्वप्नाताईला फोन लावला. "चांगला मुलगा आहे श्रीरंग. खूप मुली मागे असायच्या त्याच्या. पॉप्युलर होता तो खूप. पण तो असा काही फ्लर्ट वगैरे नाहीये. आणि ब्रिलियन्ट आहे हं एकदम तो. नेहमी टॉपर असायचा." स्वप्नाताईनेही श्रीरंगचं भरपूर कौतुक केलं. प्रियाला श्रीरंग मग आणखीच आवडायला लागला.
शुक्रवारी रात्री श्रीरंगचा फोन आला. त्याला वीकेन्डलाही ऑफिसला जायचं होतं. म्हणून तो जरा वैतागला होता. त्याचा मूड सुधारावा म्हणून तिने जरा ’सुट्टीत कुठे कुठे जातोस’- असा विषय काढला. "मला गोवा सगळ्यात जास्त आवडतं. मी तर बाईकवरुन पण गेलोय कैक वेळा. तिथे एका बीचजवळ माझं एक आवडतं हॉटेल आहे राहायला. आणि त्या हॉटेलच्या जवळच एका कॉर्नरला एक रेस्टॉरन्ट आहे. ते तसं साधंच आहे पण तिथे जबरदस्त टेस्टी फिश मिळतं. मी तिथे इतकं फिश खातो! आपलं लग्न झाल्यावर तुला घेऊन जाईन मी तिथे-"
तिने तर श्वासच रोखला त्याचं वाक्य ऐकून. तोही गडबडला लगेच.
"आय मीन...जर आपलं लग्न झालं- तर- नक्की जाऊ आपण तिथे-" तो सावरुन घेत म्हणाला.
"पण मी बाईकवरुन नाही हं येणार-" तीही सगळं लाईटली घेत म्हणाली.
"हां ते ठीक आहे...मी तुला माझ्या स्विफ्टमधून घेऊन जाईन- मला ड्राईव्ह करत जायला पण आवडतं-" तो उत्साहाने म्हणाला. अगदी पुढच्याच आठवडयात गोव्याला जात असल्यासारखं!
रात्री तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर गोव्याला जाण्याचा हाय वे दिसत होता...त्यावर श्रीरंगची निळी स्विफ्ट...एक्स्पर्टली ड्राईव्ह करणारा उंच,रुबाबदार श्रीरंग..आणि त्याच्या बाजूला बसलेली ती. सुखी, तृप्त, हसतमुख.

शनिवारी सकाळी सकाळी श्रीरंगचा गुड मॉर्निंग मेसेज आला. बिचारा शनिवारीही सकाळी सहाला उठला होता. नऊच्या सुमारास तिचा फोन वाजला. श्रीरंगचा असेल या अपेक्षेने तिने फोन घेतला, तर फोन निनादच्या आईचा होता. ते तीन दिवसांपूर्वीच शिकागोहून परत आले होते. प्रज्ञाला दोन महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती. प्रज्ञाने प्रियासाठी पाठवलेली चॉकलेट्स आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी प्रियाला ’दुपारी चहा प्यायला येऊन जा’ असं निनादच्या आईने सांगितलं.
प्रिया उत्साहात तयार झाली. श्रीरंगने पाठवलेल्या पहिल्या मेलमध्ये त्याचे डिटेल्स होते- जन्मतारीख, वेळ, स्थळ. ते तिने कागदावर लिहून घेतले.
सानेकाकांच्या समोर तिने तो कागद ठेवला. श्रीरंगला मंगळ आहे हे तिला आधीच माहीत होते. त्यामुळे पत्रिका जुळेल असंच तिला वाटत होतं.
सानेकाकांनी श्रीरंगची पत्रिका बनवली. मग दोघांच्या पत्रिकेचा अभ्यास केला.
"पत्रिका नाही जुळत आहेत तुमच्या. पुढे जाण्यात अर्थ नाही." ते गंभीरपणे म्हणाले.
प्रियाचा घसा कोरडा पडला, हातपाय कापू लागले.
"अहो पण...त्याला पण मंगळ आहे-"
"हो...आहे ना. पण केवळ मुलगा-मुलगी दोघांना मंगळ आहे याचा अर्थ पत्रिका जुळते असा होत नाही. तुम्हा दोघांच्या पत्रिका तर अजिबातच जुळत नाहीयेत."
प्रिया सुन्न झाली एकदम.
"तू भेटली आहेस त्याला?" काकांनी विचारलं.
"अं...नाही अजून.."आम्ही पुढच्या आठवडयात भेटणार होतो.." ती उत्तरली.
"हां...मग ठीक आहे. माझ्या मते तरी पुढे जाऊ नकोस. बाकी तू काय ते ठरव."
"पण...काही उपाय, सोल्यूशन नाही का?" तिने क्षीण आवाजात विचारलं.
"नाही ना. म्हणजे तशी तुझी पत्रिका ठीक आहे. त्याचीही चांगलीच आहे. पण तुमच्या पत्रिका एकमेकांशी मॅच होत नाहीत. हे बघ- तुझ्या या स्थानात ग्रह कसे पडलेत- आणि त्याच्या पत्रिकेत-" काका तिला समजावू लागले पण तिला ते स्पष्टीकरण डोक्यावरुन जात होतं.
"तरी पण म्हणजे- काय होईल- जर आम्ही केलंच लग्न तर? काय धोका आहे?" तिने चिवटपणे विचारलं.
काकांनी एक सुस्कारा सोडला.
"हे बघ...जास्त खोलात शिरु नकोस तू."
"I...I just want to know...सांगा ना काका-  What is the worst that can happen?"
"त्याच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो- अपघात-घातपात - त्यातून मृत्यू वगैरे-" काका म्हणाले.
प्रिया अवाक झाली.
"दुसरी कोणाची पत्रिका आणली आहेस का तू? का हे एकच स्थळ होतं?" काका विषय संपवत म्हणाले.
"ही एकच पत्रिका आणली होती." प्रिया म्हणाली. मग तिथून निघालीच ती तडक. काकू थांबायचा आग्रह करत होत्या तरी काहीतरी कारण काढून ती लगेच निघाली.
तिचं डोकं बधीर झालं होतं. आता काय करायचं? श्रीरंगचा तर पत्रिका बघण्यावर विश्वासच नव्हता. त्याने तिला त्याचे डिटेल्स, अगदी मराठीत केलेल्या पत्रिकेची स्कॅन केलेली कॉपीही पाठवली होती. पण त्याचबरोबर त्याला आणि त्याच्या घरच्यांना पत्रिका पाहायची नाही हेही स्पष्टच लिहिलं होतं त्याने. सानेकाकांचा प्रचंड राग आला तिला. पण त्यांची तरी काय चूक? तिने विचारलं म्हणून त्यांनी सांगितलं. ते त्यांच्या शास्त्राशी प्रामाणिक होते. पुढे हवा तो निर्णय घ्यायला ती मोकळी होती. पण जर खरंच श्रीरंगला तिच्या पत्रिकेमुळे पुढे काही झालं तर? ती ते सहन करु शकेल? स्वत:ला माफ करु शकेल?
शनिवार आणि रविवारची रात्र ती झोपूच शकली नाही. सगळा वेळ तिने विचार करण्यात आणि स्वत:च डोकं दुखवून घेण्यात घालवला. सोमवारी रात्री तिचा फोन वाजू लागला. श्रीरंग कॉलिंग...तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला. "हॅलो.." ती कसंबसं म्हणाली.
"हाय!!" त्याचा आवाज उत्साही, आनंदी, टेन्शन फ्री होता.
"सुटलो एकदाचा. झालं ते ऑडिट पूर्ण. व्यवस्थित झालं सगळं. आता मला जरा वेळ मिळेल. कधी भेटायचं आपण? हॅलो? प्रिया?"
"अं...श्रीरंग...actually...मी काल माझ्या एका ज्योतिषी काकांकडे गेले होते. म्हणजे माझ्या मैत्रिणीचे सासरे. ते गेली अनेक वर्षं माझी पत्रिका बघतात. मी त्यांना आपल्या पत्रिका दाखवल्या."
"बरं मग?" श्रीरंगच्या आवाजात नाराजी होती.
"तर...ते म्हणाले की...आपल्या पत्रिका जुळत नाहीयेत अजिबात. पुढे जाऊ नका म्हणाले. म्हणजे पुढे आपल्यालाच त्रास होईल-"
"ते काय म्हणाले ते मला सांगू नकोस. तुझं काय म्हणणं आहे ते सांग."
"माझंही...म्हणजे तेच...लेट्स स्टॉप धिस. नको भेटायला आपण." ती सगळं बळ एकवटून म्हणाली.
दोन मिनिटं जीवघेणी शांतता होती.
"अगं पण...जग कुठे पोचलंय आणि तू हे काय मानून बसलीयस..इंजिनियर आहेस ना तू? सायन्स स्टुडन्ट? मग तरीही-" त्याचा हा असा आवाज तिने कधीच ऐकला नव्हता. कातर झालेला, काहीसा हताश, हातातलं काहीतरी महत्वाचं निसटून गेल्यासारखा- तिला खूप तुटत होतं त्याच्यासाठी पण इलाज नव्हता.
"आय ॲम सॉरी. मी खरं तर आधीच पत्रिका बघायला हवी होती पण काका शिकागोला होते- ते आत्ताच आले त्यामुळे-"
तो गप्प.
"आय ॲम रियली सॉरी." ती पुन्हा म्हणाली.
"It's alright." त्याचा आवाज नाराज, तिच्यावर अतिशय चिडलेला.
"ओके देन, बाय. आणि तुझ्या सर्चसाठी ऑल द बेस्ट." तो कडवटपणे म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट न बघता त्याने फोन बंदही केला.
बंद झालेला फोन तसाच कानाशी धरुन ती कितीतरी वेळ सुन्नपणे उभी होती.

Saturday, November 3, 2012

जावे त्याच्या वंशा..


स्नेहाने शेवटचा बटाटेवडा टिश्यू पेपरवर टाकला आणि मग एकदा आपल्या कामगिरीकडे समाधानाने नजर फिरवून ती स्वयंपाकघरात घातलेला पसारा आवरु लागली. पसारा आवरुन झाल्यावर तिने नीटनेटक्या स्वयंपाकघरात चहाची तयारी केली. बटाटेवडे तिने डब्यात भरले होते. आता सचिन आला की लगेच संध्याकाळचा चहा टाकायचा, बटाटेवडे जरा थंड वाटले तर मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचे की झालं! आज रात्रीचा स्वयंपाक सकाळीच तयार झाला होता. फक्त सगळ्या गोष्टी फ्रीजमधून काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करायच्या. त्यामुळे उदया सकाळपर्यंत स्नेहाला स्वयंपाक करायचा नव्हता. तिच्याकडॆ आता रिकामा वेळ होता. तिने लॅपटॉप उघडला. फेसबुकवरती तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या त्यांच्या दुबई ट्रीपच्या फोटोंवर खूप कॉमेन्ट्स वगैरे आल्या होत्या. बटाटेवडे खात तिने फेसबुकवर नजर टाकली. ’पीपल यू मे नो’ - रीमा देशमुख. ते नाव बघून स्नेहा एकदम खूप वर्षं मागे गेली. रीमा तिच्या वर्गात होती. आठवी ते दहावी ही तीन वर्षं. वर्गात त्या दोघींची स्पर्धा लागलेली असायची. कोणाला जास्त मार्क मिळतायत, कोणाला चित्रकला स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळतंय इथपासून ते कोणाच्या मागे जास्त पोरं लागली आहेत इथपर्यंत त्या दोघी एकमेकींची चढाओढ करत असत. क्वचित कधी त्यांची मैत्रीही व्हायची पण ते सौहार्द अळवावरच्या पाण्यासारखं काही दिवसच टिकायचं. मग पुन्हा स्पर्धा चालूच. स्नेहाचा स्वभाव मुळात भिडस्त. काहीसा घाबरटच. रीमाशी स्पर्धा करण्यात तिला फारसा रसच नव्हता. आपण बरं, आपलं काम बरं असं तिचं असायचं. पण रीमा तिला काही ना काही करुन चिथवायचीच. दोघी मुली हुशार, अभ्यासाबरोबर इतरही कलागुणांत निपुण, दिसायला स्मार्ट, सुंदर. त्यामुळे त्यांची ही अघोषित स्पर्धा शाळेतल्या लोकांसाठी एक प्रकारचं मनोरंजनच झाली होती.
दहावीच्या परिक्षेत स्नेहाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले. घरी आईबाबा नाही म्हटलं तरी अपसेट झालेच. नातेवाईकांचे टोमणे, मित्रमैत्रिणींच्या पालकांच्या चौकश्या. नको नको होऊन गेलं तिला सगळं. रीमाला मात्र चांगले गुण पडले होते आणि चांगल्या कॉलेजात प्रवेशही.
नंतर त्या दोघींचे मार्ग वेगळे झाले. शाळेतल्या इतर मित्रमैत्रिणींशी स्नेहाने संपर्क ठेवला पण रीमाशी मात्र नाही. आताही तिने रीमाला फ्रेन्ड रिक्वेस्ट टाकण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय रीमालाही तिचं प्रोफाइल दिसत असणारच कारण त्यांचे खूप कॉमन फ्रेन्ड्स होते. पण रीमानेही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली नव्हती. अर्थात, तिने पाठवली असती तरी स्नेहाने ती स्वीकारली नसतीच. पण रीमाविषयी उत्सुकता होतीच, त्यामुळे स्नेहाने तिचं प्रोफाइल उघडलंच. याला stalking म्हणतात हे तिला माहीत होतं. पण तिला खूपच उत्सुकता होती रीमा काय करतेय सध्या हे पाहण्याची.
रीमा एका मोठया आय.टी. कंपनीत नोकरी करत होती. साधीसुधी नोकरी नाही- ती प्रोजेक्ट मॅनेजर होती. तिच्या फोटो अल्बम्समध्ये जगभरातले फोटो होते. ऑफिसच्या कामानिमित्त जगभर फिरत होती ती. शिवाय एका मोठया मॅनेजमेन्ट कॉलेजमधून एक एक्झिक्युटिव एमबीएचा कोर्सही करत होती. शाळॆत दिसायची त्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिने घेतलेल्या नवीन महागडया गाडीचेही फोटो होते. आणि नुसतीच नोकरी एके नोकरी करत नव्हती रीमा. ती खूप पुस्तकं वाचत होती, चांगले चित्रपट बघत होती, तिच्या पेन्टिंग्जचे फोटोही होते फेसबुकवर. शिवाय जगभर फिरत असल्यामुळे फोटोग्राफीचाही छंद होता तिला. साडीपासून मिनी स्कर्टपर्यंत सगळया कपडयात सुंदर दिसंणारी, देशीविदेशी मित्रमैत्रिणी असणारी, लाखो रुपये कमावणारी, जगभर फिरणारी, छंद जोपासणारी रीमा पाहून स्नेहाला अगदी बिचारं असल्यासारखं वाटू लागलं. ती काय काय करतेय, कुठे पोचलेय..आणि आपण? नवऱ्यासाठी बटाटेवडे करतोय! स्नेहानेही शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्तम नोकरी मिळवली होती. पण लग्न झालं आणि सचिनला अमेरिकेला जावं लागलं. त्याच्याबरोबर तिलाही. मग दिली सोडून नोकरी. अमेरिकेत इतकी मंदी होती की तिथे तिला नोकरी मिळणं, कोणीतरी तिचा एच वन व्हिसा स्पॉन्सर करणं- सगळंच अवघड होतं.  भारतात परत आल्यावर पुन्हा नोकरी करण्याचा विचार मनात डोकावू लागला. पण आता सासर-माहेरच्यांना नातवंड हवं होतं. पटकन दिवस गेले नाहीत तेव्हा चेक-अप, फर्टिलिटी ट्रीटमेन्टचं चक्र चालू झालं. ट्रीटमेन्टच्या दरम्यान स्ट्रेस नको म्हणून डॉक्टरांनीच सुचवलं की नोकरी सध्या करु नकोस. आणि तशी आर्थिक गरज नव्हतीच. त्यामुळे आता तिचं आयुष्य ठरुन गेलं होतं- स्वयंपाक करायचा, घर नीटनेटकं ठेवायचं, दर महिन्याला ट्रीटमेन्टचं फळ मिळण्याची वाट बघायची, बाकी मग होतंच- टीव्ही, वाचनालय, शेजारी-पाजारी, नातेवाईक, मैत्रिणी- वेळ निघून जायचाच सहज. डॉक्टरांच्या मते अजून एक-दीड वर्षात स्नेहा आई होईल. मग आईपणात ती गुंतून जाणार. नोकरी वगैरे पुढची काही वर्षं कठीणच. आणि मग त्यानंतर तिला कोण चांगली नोकरी देणार? एखादी फुटकळ नोकरी मिळाली तर सचिन अजिबात करु देणार नाही.
सचिन स्वभावाने चांगला होता, सरळ मनाचा होता पण त्यांच्या संसारात सगळे मोठे निर्णय तोच घेणार हे नकळत ठरुनच गेले होते. स्नेहाच्या वाटयाला दुय्यम भूमिका कधी आली हे तिलाही कळले नव्हते.
आणि रीमा...ती किती सुखात होती...लग्न केलेले नाही...त्यामुळे नवरा, सासरची माणसे यांची मर्जी सांभाळण्याची जबाबदारी नाही. अजून ती तिच्या आईबाबांच्या घरीच राहत होती....त्यामुळे घरकामाची कटकट नाही. स्वयंपाकघरात तासनतास राबणे नाही. कोणी काहीही बोलणार नाही. "दिवसभर घरीच बसून असतेस ना?" "वेळ कसा जातो तुझा?" "बाहेर जाऊन नोकरी कर म्हणजे कळॆल तुला किती कठीण असतं सगळं ते!" असं काहीही ऐकून घ्यावं लागत नसेल. मोठी नोकरी, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वरचेवर जाणे, परदेशात (तेही ऑफिसच्या खर्चाने) फिरणॆ, भरपूर पैसा मिळवून तो स्वत:च्या मर्जीनुसार खर्च करणे, सतत नवीन गोष्टी शिकत राहणे, स्वत:च्या आवडी-निवडी जपणे- मजा होती  नुसती. स्वतंत्र, मुक्त आयुष्य जगत होती ती. कोणाला काही विचारायला नको, कोणाचं ऐकून घ्यायला नको. हवं तेव्हा झोपायचं, हवं तेव्हा उठायचं, हवं ते खायचं-प्यायचं. ’उदया भाजी कुठली करायची?" हा प्रश्न नसेल. स्नेहाला आता आपण अगदीच गरीब बिचारी काकूबाई झालो आहोत असं वाटू लागलं. तेव्हढयात बेल वाजली. सचिन आला होता. लॅपटॉप खाली ठेवून ती उठली. दार उघडून तिने सचिनला घरात घेतलं आणि लगबगीने चहाची तयारी करायला गेली. बटाटेवडे प्लेटमध्ये काढत असताना बाहेरुन सचिनचा त्रासलेला आवाज आला- "तुझा लॅपटॉप वापरुन झाला असेल तर बंद का नाही करत? निदान अनप्लग तरी कर. उगाच विजेचं बिल वाढतं- परवाच भरलं मी बिल..खूप जास्त आलं होतं गेल्या महिन्याचं-" "बिल वाढतं ते तुझा एसी सतत चालू असतो म्हणून-" असं म्हणावं असं स्नेहाच्या मनात आलं. पण तिने स्वत:ला आवरलं. उगाच तिला वाद नको होता. आपण कमवत नाही म्हणून सचिन आपल्याला पैश्यांवरुन असं बोलू शकतो असं वाटून तिला आणखीच बिचारं वाटू लागलं. "तू महिन्याला पाच लाख कमवत असतीस तरी सचिन हेच बोलला असता- त्याच्या दृष्टीने हा प्रश्न पैश्यांचा नसून विजेच्या गैरवापराचा आहे-" तिच्या लॉजिकल मनाने मुद्दा काढला. तो तिला पटलाही. तिने सचिनला चहा-खाणं बाहेर नेऊन दिलं. सचिनने बटाटेवडयांचं कौतुक केलं, मनापासून भरपेट खाल्ले...तेव्हा तिचा पडलेला चेहरा जरा सुधारला.

रीमा रात्री जेवण झाल्यावर तिच्या खोलीत आली. घडयाळात साडेनऊ वाजले होते. उदया शनिवारची सुट्टी असल्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती. तिने बेडमध्ये बसूनच लॅपटॉप ऑन केला. मेल्स वगैरे बघत एकीकडे फेसबुक उघडलं. पीपल यू मे नो- स्नेहा रानडे-आगाशे. तिने स्नेहाच्या प्रोफाइलवर क्लिक केलं. स्नेहा रानडे-आगाशे. मॅरिड टू सचिन आगाशे. प्रोफाइल फोटोत स्नेहाच्या बरोबर तिचा देखणा, उंच, गोरा-घारा नवरा. सचिन आगाशे. अल्बम्समध्ये फोटो होते- काही दुबईतले, काही अमेरिकेतले, काही मुंबईतलेच नातेवाईकांबरोबर वगैरे काढलेले. स्नेहाचं वजन वाढलं होतं. पण ते तिला शोभतही होतं. काठपदराची उंची साडी, ठसठशीत मंगळसूत्र, सोन्याचे घसघशीत दागिने घातलेली स्नेहा आणि तिच्या बाजूला सचिन. काही फोटो स्नेहाच्या पाककृतींचे होते. काही मैत्रिणींबरोबर काढलेले.
रीमाच्या मनात तुलना येऊन गेली आणि काहीशी असूयाही. स्नेहा पूर्णवेळ गृहिणी होती. काय आयुष्य असेल- छानपैकी स्वयंपाक करायचा, घर सजवायचं. दुपारी झोप काढायची, टीव्ही सीरीयल्स बघायच्या. ऑफिसमधल्या कटकटी नाहीत. तासनतास रात्रीबेरात्री काम करणं नाही. रात्री उशीरा एकटं घरी परतताना वाटणारी असुरक्षितता नाही. सुरक्षित, उबदार घराच्या चौकटीतलं आयुष्य. तिचे त्रास, संकटं, मनातले विचार- सगळं शेअर करायला तिचा हक्काचा नवरा होता. रात्रीच्या थंडीत तिला कुडकुडत एकटं झोपावं लागत नव्हतं. तिच्या नवऱ्याच्या उबदार कुशीत ती निर्धास्त झोपत असेल. आणि आपण? कितीही यश मिळवलं आपल्या करीअरमध्ये तरी नातेवाईक, मित्रमैत्रिणी या गोष्टीची जाणीव करुन देणारच की आपलं लग्न झालेलं नाहीये, आपण एकटया आहोत. आईबाबा काय आज आहेत, ते काही आयुष्यभर पुरणार नाहीत, वगैरे.
तसा रीमाने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला स्थळं भरपूर येत होती तिच्यासाठी. पण तिला कोणी पटकन पसंतच पडत नव्हतं. त्यामुळे बरीचशी स्थळं वजा होत होती. जी उरत होती त्यातली काही पत्रिका न जुळल्यामुळे बाद. त्यातून उरलेल्या स्थळांच्या बाबतीत कधी तिचा नकार- काही ना काही कारणांमुळे. आणि जिथे तिला सकारात्मक भावना होती तिथे नेमका समोरच्या बाजूने नकार. त्यामुळे योग जुळून आलाच नव्हता. आपल्या अपेक्षा कमी करुन नुसतं करायचं म्हणून मनाविरुध्द लग्न केलं तर आपण सुखी होणार नाही असं तिचं मत होतं. त्यामुळे तसं काही करण्याचा प्रश्न नव्हता. सुटेबल स्थळ असेल तर लग्न करायची तिची आजही तयारी होती पण आताशा स्थळं कमीच येत होती. तीच तीच स्थळं परत येत होती. तिच्यायोग्य असणाऱ्या बऱ्याच चांगल्या मुलांची लग्नं झाली होती. आईबाबांना तिच्या लग्नाची चिंता होतीच पण आता तेही स्थळं शोधून थकले होते, त्यांचंही वय झालं होतं. त्यांनीही हा विषय सारखा सारखा काढणं थांबवलं होतं. तिच्या कॉर्पोरेट जगातले पुरुष दोन प्रकारचे. काही जण तिच्याशी जेव्हढयास तेव्हढं प्रोफेशनल वागणारे. तर काहीजण ’इतर’ अपेक्षा ठेवणारे. ती खंबीर होती त्यामुळे कोणी थेट काही सुचवण्याचं धाडस केलं नव्हतं. शारीरिक सुखाची ओढ तिलाही होती पण तिला तिच्या संस्कारांशी विपरीत काही करायचं नव्हतं. आणि रीतसर लग्नाची मागणी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कुणी तिला अजूनतरी घातली नव्हती. विवाहित लोकांच्या ग्रुप्समधे चालणारे टिपीकल विषय- संसार, मुलं- यात तिला गम्य नसल्याने आजकाल अशा ग्रुप्समध्ये ती केवळ एक मूक श्रोता होऊ लागली होती. ऑफिसमधून घरी आल्यावर तिला एकटेपणा  जाणवू लागला होता. तिने ज्या ऑनलाईन matrimonial साईटवर नाव नोंदवलं होतं तिथे लॉग इन करुन ती पुन्हा एकदा स्थळं शोधू लागली. फेसबुकचं पेज क्लोज करताना ’स्नेहाचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त चांगलं आहे’ हा विचार मनात परत आलाच.

स्नेहा स्वयंपाकघरातली झाकपाक करुन बेडरुममध्ये आली. सचिनचा ऑनसाईट कॉल चालू होता त्यामुळे तो लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये ठाण मांडून बसला होता. दार लोटून ती बेडवर पडली. डोळे मिटून झोपेची आराधना करताना मनात विचार आला की रीमाचं आयुष्य आपल्यापेक्षा किती छान आहे.

Sunday, October 28, 2012

फेसबुकवरचे काही उल्लेखनीय मनुष्य-विशेष


उठसूठ चेक-इन करणारे : फेसबुकने तुम्ही कुठे आहात हे सांगण्यासाठी चेक-इनची सुविधा उपलब्ध केली आणि काही लोकांनी तो चेक-इन प्रकार जरा अतीच करायला सुरुवात केली. म्हणजे सारखं चेक-इन करायचं- आज काय - ही मंडळी घराशेजारच्या उडप्याच्या हाटिलात गिळायला गेली आहेत. उदया काय- घराजवळच्या मल्टिप्लेक्समध्ये कुठला तरी टुकार हिंदी चित्रपट बघायला गेली आहेत. बरं- नुसतं चेक-इन करुन ही मंडळी थांबत नाहीत. त्यात ’with' कोण-कोण आहे हे महत्त्वाचं. विशेषत: कपल्समध्ये हे फॅड असतं. म्हणजे ’झंप्या गाढव इज विथ पिंकी गाढव ॲट हॉटेल सत्कार’- छापाच्या पोस्ट करायच्या. (ही नावे काल्पनिक आहेत अर्थात.)
आता एखादा माणूस आणि त्याची बायको शनिवारी कुठच्या हॉटेलमध्ये गेले आहेत याच्याशी इतरांना काय करायचंय? पण असं स्वत:, स्वत:ची बायको/नवरा आणि एखादं-दुसरं सोबत असलेलं कपल - यांना विकेन्डला एखादया मॉल, मल्टिप्लेक्स किंवा हॉटेलमध्ये टॅग केलं की आपण किती ’कूल’ आहोत, आपलं मॅरिड लाईफ आणि सोशल लाईफ किती हॅपनिंग आहे असं या लोकांना दाखवायचं असावं. त्यात जर हे लोक कुठे सहलीला गेले तर मात्र यांना ऊत येतो. आधीच मर्कट, त्यातच मदय प्याला अशी त्यांची अवस्था होते. ते अगदी एअरपोर्टपासून चेक-इन आणि टॅग करायला सुरुवात करतात ते पार राहण्याचं हॉटेल, फिरण्याचे स्पॉट्स- जिथे जिथे रेन्ज मिळते तिथे तिथे फेसबुक भरत बसतात. कुठे कधी बाहेर गेले नसले, घरीच असले, तर आपण घरी आहोत, हे सुद्धा चेक-इन करुन फेसबुकवर टाकतात आणि त्यात घरातल्या लोकांना आणि घरी पाहुणे आले असले तर त्यांना टॅग करतात.

प्रेमात असलेले नवरा-बायको: तशी ही जमात अल्पसंख्य आहे. कारण प्रेमात पडून जरी लग्न केलं तरी एकदा नवरा-बायको झाल्यावर तुम्ही जमिनीवर येताच. पण ही काहीकाही कपल्स लग्नानंतरही फार प्रेमात वगैरे असतात. मग या प्रेमात असलेल्या बायका नवऱ्याला फेसबुकवरती ’माय शोनू’, ’माय स्वीटू’, ’माय हबी’ वगैरे संबोधित करतात. नवरेही बायकोला ’माय लव्ह’, ’wifey', 'बेबी’ वगैरे म्हणत असतात. मग हे लोक फेसबुकवरती एकमेकांची कौतुकं करत बसतात. एकमेकांच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला- एकाच  घरात असले तरी एकमेकांना फेसबुकवरुन विश करतात. एकमेकांचे वेगळे किंवा दोघांचे एकत्र फोटो सतत टाकत बसतात. प्रेमाचं प्रदर्शन करण्यासाठी फेसबुक हे माध्यम यांना आवडतं.

लहान मुलांचे पालक: या जमातीची ओळख यांच्या प्रोफाइल फोटोवरुनच होते. यांच्या प्रोफाइल किंवा कव्हर फोटोमध्ये यांची मुलं असतात. आता मुलासकट स्वत:चा फोटो कुणी टाकला तर ठीकच, पण हे लोक फक्त मुलांचे फोटो टाकतात- तेसुद्धा स्वत:चं प्रोफाइल पिक्चर म्हणून. ’मुलाचे फोटो टाकणं’ हा त्यांचा फेसबुकवरील मुख्य उदयोग असतो असं मात्र नाही. हे लोक सतत पालकत्वाबद्दलचे त्यांचे विचार, त्यांचं मूलच कसं जगातलं सगळ्यात हुशार, गोड मूल आहे, मूल असल्यामुळे यांचं जीवन कसं सफल झालं आहे- हे फेसबुकवर टाकत बसतात. यांच्या मुलांची नावंही ठराविक असतात. मुलगा असेल तर आर्य, आर्यन, विहान, विवान, अथर्व, वेदांत, इशान, नील, अर्णव इत्यादी. मुलगी असेल तर आर्या, सिया, सानवी, सारा, रिद्धी, वगैरे. मुलांचे फोटो कितीही गोड असले तरी ते किती टाकायचे याला काही मोजमाप या मंडळींकडे नसते.
काही लोक तर आपल्या लहान मुलांच्या नावाचे फेसबुक अकाऊंट उघडतात. आणि मग त्यातून स्वत:च पोस्ट करत बसतात लहान मुलाच्या वतीने. आवरा रे कुणीतरी त्यांना!

भारतावर कावळ्यासारखी नजर ठेवून असणारी परदेशस्थ भारतीय मंडळी: ही मंडळी परदेशात स्थायिक झालेली असतात. परदेश म्हणजे अमेरिकेपासून दुबईपर्यंत कुठलाही देश पण त्यातही अमेरिका, कॅनडा किंवा युकेतील मंडळी या कॅटेगरीत जास्त आढळतात. तिथे राहात असलेल्या या लोकांचं भारताकडे भारी लक्ष असतं. आणि भारतातल्या प्रत्येक घडामोडीवर फेसबुकवरुन हे लोक सतत भाष्य करत असतात. अण्णा हजारेंचं आंदोलन, रॉबर्ट वद्राची मालमत्ता, क्रिकेट सीरीजमधला भारतीय टीमचा परफॉर्मन्स- या सगळ्यात या परदेशस्थ फेसबुककरांना भलताच रस असतो. यातही - जे लोक काही कारणामुळे थोडया कालावधीसाठी परदेशात राहतात (यात मीही आलेच) पण भारतातच स्थायिक होण्याचा ज्यांचा निर्णय झालेला असतो, ते लोक या अशा भारताबद्दल कॉमेन्टस करण्यात रस दाखवत नाहीत. कॉमेन्ट्स करणारी मंडळी ही जास्त करुन स्वत: ग्रीनकार्डधारक असतात आणि अमेरिकन नागरिकत्वाच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू असते. भारत कसा वाईट आहे, भारतात भ्रष्टाचार कसा चालू आहे- यावर या लोकांची सतत टिप्पणी चालू असते. थोडक्यात- भारतात राहणाऱ्या लोकांना "कसे राहता तुम्ही त्या डर्टी इंडियात? आम्ही बघा कसे पृथ्वीवरच्या स्वर्गात राहतो" असे खिजवण्याचा यांचा हेतू असावा. भारतात राहणाऱ्या लोकांना नसते इतकी यांना भारतातल्या घडामोडींची माहिती असते. भारतातल्या चांगल्या गोष्टी यांना कधीच दिसत नाहीत. पण भारताला सतत नावे ठेवण्यात यांचा हात कोणी धरु शकत नाही. भारतात कुठे काहीही झाले- विशेषत: दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट वगैरे- तर हे लोक अमेरिकेत किंवा युकेत बसून सात्विक संतापाने भरलेले पोस्ट टाकतात. "हे असं कुठवर चालणार?" वगैरे बरंच काय काय. मात्र अमेरिकेत किंवा युकेमध्ये भारतीयांवर हेट क्राईमवाले जे हल्ले होतात (परवा Wisconsin ला झाला तसा) त्यावेळी मात्र ही मंडळी गप्प असतात (बहुधा भीतीने दातखिळ बसत असावी.)

अर्थात, या सगळ्या मंडळींमुळेच फेसबुकवर टाईमपास होतो त्यामुळे यांनी आपले हे चांगले काम असेच चालू ठेवावे ही कळकळीची विनंती :)

Thank You